(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी शनिवारी विक्रम-१ च्या यशस्वी कक्षीय प्रक्षेपणाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, ही ऐतिहासिक मोहीम भारताच्या खाजगी अंतराळ उद्योगासाठी एका नव्या युगाची सुरुवात असून ‘आत्मनिर्भर भारत’च्या भावनेचे एक खरे उदाहरण आहे.
‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये गौतम अदानी म्हणाले की, “विक्रम-१ चे पहिले यशस्वी कक्षीय उड्डाण आणि मोहिमेची सर्व उद्दिष्टे साध्य होणे, ही भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या खाजगी अंतराळ परिसंस्थेसाठी एक ऐतिहासिक उपलब्धी आहे.
अदानी म्हणाले, “हे अभियान शक्य करुन दाखवल्याबद्दल पवन चंदना, भारत ढाका, स्कायरूट एरोस्पेसची उत्कृष्ट टीम, तसेच इस्रो आणि इन-स्पेस यांचे मनःपूर्वक अभिनंदन. विक्रम-१ ने आपल्या पहिल्याच कक्षीय उड्डाणात मोहिमेची सर्व उद्दिष्ट्ये यशस्वीरित्या पूर्ण केली असून, भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्रासाठी एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. इतिहास घडला आहे. विक्रम-१ ने आपल्या पहिल्याच कक्षीय उड्डाणात मोहिमेची सर्व उद्दिष्ट्ये उत्कृष्टपणे पूर्ण केली आहेत. हाच ‘आत्मनिर्भर भारता’चा खरा पुरावा आहे.” असं म्हणत त्यांनी कौतुक केलं आहे.
या मोहिमेचे वर्णन भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक असे करताना ते म्हणाले की, ही कामगिरी देशाची वाढती तांत्रिक क्षमता आणि नाविन्यपूर्ण शक्ती जगाला दाखवते. ते म्हणाले, “या टीमचे सरासरी वय फक्त २८ वर्षे आहे. तरुण भारत काय साध्य करू शकतो, याचा हा जगाला दिलेला पुरावा आहे. जय हिंद!”
शनिवारी सकाळी, हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेसने ‘मिशन आगमन’चा भाग म्हणून विक्रम-१ चे यशस्वी प्रक्षेपण केले. यासह, अमेरिका आणि चीननंतर भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे, जिथे एका खाजगी कंपनीने कक्षेत रॉकेट प्रक्षेपित करण्याची क्षमता यशस्वीरित्या प्रदर्शित केली आहे. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावर असलेले, चार टप्प्यांचे विक्रम-१ हे प्रक्षेपण यान लहान उपग्रहांसाठी जलद आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण बाजारपेठेत भारताचे स्थान अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हे अभियान एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते.जवळपास सात मजली उंच असलेले हे रॉकेट पृथ्वीच्या निम्न कक्षेत (LEO) सुमारे ४५० किलोमीटर उंचीवर पोहोचवण्यासाठी पाठवण्यात आले. या यशस्वी प्रक्षेपणामुळे, भारत त्या निवडक देशांच्या गटात सामील झाला आहे, जिथे खाजगी कंपन्यांनी कक्षीय प्रक्षेपण क्षमता यशस्वीरित्या प्रदर्शित केली आहे.






