शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह; उष्णतेमुळे पालक चिंतेत; आरोग्याला धोका होण्याची भीती
गत अनेक वर्षांपासून विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरू होत होत्या. परिसरातील हवामानाचा विचार करून न्यायालयानेही यापूर्वी २६ जूनपासून शाळा सुरू करण्यास समर्थन दिले होते. यंदा मात्र राज्यभर एकसमान दिनांक निश्चित करत शासनाने १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच १५ ते ३० जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विदर्भात यंदा तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून जून महिन्यातही अपेक्षित पाऊस झालेला नाही. सध्या अनेक भागात दुपारचे तापमान ४० अंशांच्या वर कायम आहे.
अशा परिस्थितीत सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत शाळा भरविल्यास विद्याथ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून सायकलने किंवा पायी शाळेत जातात. काही ठिकाणी बससेवाही नियमित नाही. त्यातच अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याची स्थिती आहे. विहिरी कोरड्या पडल्या असून जलपुरवठाही अनियमित असल्याने विद्यायांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. भीषण उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना उष्माघात, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि इतर आरोग्यविषयक समस्यांचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन शासनाने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. भीषण उष्णतेमुळे विद्याथ्यर्थ्यांना होणाऱ्या संभाव्य त्रासापासून संरक्षण मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शिक्षण राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यापूर्वी विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने पालक संभ्रमात आहेत. विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनांनीही शासनाकडे निवेदने देत विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरू करण्याची मागणी केली आहे.






