‘आठवा अजूबा’ ब्रीजवर पुन्हा वाद; नवराष्ट्रच्या बातमीनंतर मनसे प्रशासनाला धारेवर धरणार
या प्रकरणावर संदीप राणे म्हणाले की, नागरिकांच्या पैशातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. ब्रीजचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात विविध त्रुटी समोर येत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प भ्रष्टाचाराचे प्रतीक बनला असून नागरिकांमध्ये त्याबाबत तीव्र नाराजी आहे. मनसेच्या वतीने प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडे ब्रीजची आवश्यक दुरुस्ती करून तो तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पातील विलंब आणि कथित अनियमिततेची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता “आठवा अजूबा” ब्रीज लवकर सुरू झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, मिरा-भाईंदर परिसरात वाढती वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत हा ब्रीज लवकर सुरू झाल्यास वाहतुकीचा ताण कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, वारंवार उघड होत असलेल्या त्रुटींमुळे या प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून ब्रीजच्या कामासंदर्भात अंतिम निर्णय आणि उद्घाटनाची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.
मिरा-भाईंदर येथील ‘आठवा अजूबा ब्रीज’ (उड्डाणपूल) हा एमएमआरडीए (MMRDA) द्वारे उभारण्यात आलेला एक वादग्रस्त पूल आहे, जो त्याच्या विचित्र रचनेमुळे सोशल मीडियावर ‘आठवा अजूबा’ म्हणून प्रचंड ट्रोल झाला. हा १०० कोटींचा डबल-डेकर चार पदरी पूल असून, तो पुढे फाटकाजवळ उतरताना अचानक दोन पदरी होतो. हा उड्डाणपूल मिरा-भाईंदर शहरात मेट्रो मार्गासमांतर उभारण्यात आला आहे .या विचित्र बांधकामामुळे भविष्यात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता। वाढत्या टीकेमुळे या पुलाच्या डिझाईनवरून मोठा राजकीय वादही निर्माण झाला होता. पुलाच्या या रचनेवर खुलासा करताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की, जागेच्या अभावामुळे आणि मेट्रोच्या खांबांमुळे पुलाला उतरताना अरुंद करणे भाग पडले.






