फोटो सौजन्य- सोशल मीडिया
UPSC & SSC Exam Big Changes 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. वर्ष २०२६ मध्ये कर्मचारी निवड आयोग आणि संघ लोकसेवा आयोग या दोन्ही संस्थांच्या भरती प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा मुख्य उद्देश निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि जलद बनवणे हा आहे, जेणेकरून भरतीसाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि उमेदवारांना जास्त वाट पहावी लागणार नाही.
राज्यसभेत एका लेखी उत्तरात केंद्रीय कर्मचार्यांचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की, विविध सुधारणांमुळे SSC कडून आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांचे भरती चक्र आता १५-१८ महिन्यांवरून घटून ६-१० महिने इतकेच राहिले आहे. यामागे पेन-पेपर आधारित परीक्षा पूर्णपणे संगणकावर आधारित करणे, परीक्षेच्या टप्प्यांची संख्या कमी करणे आणि परीक्षेच्या नोटीसचा कालावधी सुमारे ४५ दिवसांवरून कमी करून २१ दिवसांवर आणणे ही मुख्य कारणे आहेत.
याशिवाय, उमेदवारांच्या कागदपत्रांची सुरक्षा आणि त्यातील संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी एक ऑनलाईन केंद्रीय ई-डोजिअर सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच आता उमेदवारांची सर्व महत्त्वाची कागदपत्रे एकाच ऑनलाईन डिजिटल फाईलमध्ये सुरक्षित ठेवली जातील. यामुळे कागदपत्रांची पडताळणी सोपी होईल आणि भरती प्रक्रिया अधिक वेगाने व पारदर्शकतेने पार पडेल.
ही यंत्रणा CGL, CHSL आणि JE यांसारख्या अनेक मोठ्या परीक्षांमध्ये आधीच लागू करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया जलद करण्यासाठी आता वर्णनात्मक परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी संबंधित मंत्रालय आणि विभाग करतील. तसेच, भरती लवकर पूर्ण व्हावी यासाठी मुलाखतीची प्रक्रियाही रद्द करण्यात आली आहे.
हा मुद्दा अलीकडेच संसदेच्या सत्रादरम्यान ‘पेपर लीक’वर झालेल्या चर्चेतही समोर आला होता. तेथे मंत्र्यांनी स्पष्ट केले की, केंद्राच्या चार प्रमुख भरती संस्था — UPSC, SSC, RRB आणि IBPS — पारदर्शकता वाढवण्यासाठी सातत्याने सुधारणा करत आहेत.
याव्यतिरिक्त, SSC CGL 2026 च्या भरतीमध्येही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत:
नवीन पेपर लागू: असिस्टंट ऑडिट ऑफिसर आणि असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर या पदांसाठी टियर-२ (Tier-2) परीक्षेत एक नवीन ‘पेपर-३’ जोडण्यात आला आहे. यामध्ये वित्त आणि अर्थशास्त्राशी संबंधित प्रश्न विचारले जातील.
जागांची संख्या: या वर्षीच्या भरतीमध्ये एकूण १२,२५६ पदे भरली जाणार आहेत, तर गेल्या वर्षी ही संख्या सुमारे १४,५८२ होती; म्हणजेच या वेळी जागांमध्ये काहीशी घट पाहायला मिळाली आहे.
लाईव्ह फोटो व्हॅरिफिकेशन: परीक्षेत कॉपी करणे आणि बनावट उमेदवारांना रोखण्यासाठी ‘लाईव्ह फोटो व्हॅरिफिकेशन’ सारख्या डिजिटल तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत, जेणेकरून परीक्षा पूर्णपणे निष्पक्ष वातावरणात पार पडेल.






