संग्रहित फोटो
धाराशिव : राज्यात गुन्हेगारीनं डोकं वर काढलं आहे. दररोज गंभीर गुन्हेगारीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उसतोडीच्या उचलीच्या पैशांच्या वादातून १६ वर्षीय मुलाला मारहाण करून बळजबरीने घेऊन गेल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील पळसप येथे घडली आहे. या प्रकरणी उसतोड मुकादमासह चौघांविरुद्ध अपहरण, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील पारेकर (मुकादम), दिलीप गोविंद काळे, मच्छिंद्र गोविंद काळे आणि अर्चनाबाई दिलीप काळे यांनी ४ जुलै रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता पळसप येथील सचिन सुनील काळे याला अडविले. उसतोडीच्या उचलीचे पैसे परत द्या, अन्यथा कामावर या, अशी मागणी करत आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
मजुरांची सुरक्षा धोक्यात
या नंतर सचिनला त्याच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने सोबत घेऊन जात उचलीचे पैसे दिल्यानंतरच मुलाला सोडू, अन्यथा तो आमच्याकडेच राहील, अशी धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर सचिनची आई कौशल्या सुनील काळे (वय ३५, रा. पळसप) यांनी २४ जुलै रोजी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे उसतोड मजुरांच्या उचलीच्या व्यवहारांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उचलीच्या पैशांवरून मजुरांवर दबाव टाकणे किंवा धमकावण्याच्या घटना अधूनमधून समोर येत असून, या प्रकरणामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
हे सुद्धा वाचा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; दारूड्याकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या
घाटी परिसरातून महिलेचे अपहरण
इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत विवाहितेला घाटी परिसरातून दुचाकीवरून पळवून नेत तिला डांबून ठेवत सलग दोन दिवस अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १६ ते १७ जुलैदरम्यान घडला आहे. बेगमपुरा पोलिसांनी तपास करुन आरोपीला नेवासा (जि. अहिल्यानगर) येथून बेड्या ठोकल्या आहेत. राजू माळी असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.






