( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात विठ्ठलभक्तांसाठी एक खास संगीतमय भेट घेऊन ‘पालखी निघाली वारीला’ हे नवीन भक्तिगीत प्रदर्शित करण्यात आले आहे. विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि वारकऱ्यांच्या अढळ श्रद्धेचं दर्शन घडवणारं हे गीत नुकतंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.
या भक्तिगीताला ग्रॅमी पुरस्कार विजेते आणि पद्मश्री शंकर महादेवन तसेच मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित गायिका रीवा राठोड यांनी आपल्या सुमधुर आवाजाने सजवलं आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ गायक-संगीतकार रूप कुमार राठोड आणि गायिका सुनाली राठोड यांची कन्या असलेल्या रीवा राठोडने याच गीतातून प्रथमच मराठीत गायन केलं आहे.
या गीताला ज्येष्ठ संगीतकार रूप कुमार राठोड यांनी संगीत दिलं असून, डॉ. दीपक वझे यांनी विठ्ठलभक्ती, वारकरी परंपरा आणि श्रद्धेचं सार प्रभावी शब्दांत मांडलं आहे. गाण्याची आकर्षक ध्वनिचित्रफीत सौ. श्वेता परुळकर यांनी साकारली असून, हे गीत DFF प्रस्तुत करत आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रदर्शित झालेलं हे भक्तिगीत वारकरी संप्रदायाची भक्ती, एकता आणि परंपरा अनुभवण्याची संधी देत आहे. ‘विठ्ठल… विठ्ठल…’ या नामघोषासह पालखी सोहळ्याचं भव्य दर्शन घडवणारं हे गीत प्रत्येक भक्ताच्या मनात भक्तीचा दीप प्रज्वलित करेल.
या गाण्याविषयी बोलताना शंकर महादेवन म्हणाले, “‘पालखी निघाली वारीला’ गाताना मला प्रत्यक्ष वारीचा अनुभव घेत असल्यासारखं वाटलं. विठ्ठलभक्ती, वारकऱ्यांचा उत्साह आणि त्या वातावरणातील सात्त्विक ऊर्जा या गाण्यातून व्यक्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”
तर रीवा राठोड म्हणाल्या, “वारी ही भावनांची आणि श्रद्धेची अखंड यात्रा आहे. अशा पवित्र भावनेवर आधारित गाण्याचा भाग होता आलं, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. हे गीत ऐकताना श्रोत्यांना विठ्ठलनामात तल्लीन झाल्याचा अनुभव नक्कीच मिळेल.”






