GDP Growth Rate: देशाचा खरा विकासदर ७.७ टक्के नव्हे, तर केवळ २.७ टक्केच ! माजी अर्थमंत्र्यांचा खळबळजनक दावा
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ‘आजची भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावरील विशेष चर्चासत्रात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. सिन्हा यांनी देशाच्या आर्थिक आकडेवारीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सांगितले की, नोव्हेंबर २०२५ मध्ये जागतिक नाणेनिधीने भारताच्या आर्थिक माहिती संकलन पद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत ‘सी’ ग्रेड दिली होती.
वास्तविक परिस्थिती आणि सरकारी आकडेवारीमध्ये ४ ते ५ टक्क्यांची तफावत असल्याचा दावा करत त्यांनी म्हटले की, चुकीच्या आकडेवारीवर आधारित धोरणे कधीच प्रभावी ठरू शकत नाहीत. गेल्या १२ वर्षांतील आर्थिक स्थितीचा आढावा घेताना त्यांनी देशांतर्गत बचत आणि गुंतवणूक जीडीपीच्या सुमारे ३३ टक्क्यांवर स्थिर असल्याचे सांगितले. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट सरकार मांडत असले, तरी त्यासाठी सातत्याने किमान ८ टक्के विकासदर आवश्यक असल्याचे त्यानी नमूद केले.
शेती आणि परराष्ट्र धोरणावर भाष्य करताना ‘एल निनो च्या प्रभावामुळे यंदा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील संकटाकडे लक्ष वेधले. तसेच अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेल्या अतिरिक्त शुल्काविरोधात केंद्र सरकारने ठोस भूमिका घेतली नसल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी पुणे पूर्व विभाग काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, नीलिमा सिन्हा, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस गटनेते चंदुशेठ कदम, प्रवक्ते गोपाळ तिवारी, सुनील शिंदे, दीपाली डोख आदी मान्यवर उपस्थित होते.






