विधानपरिषदेसाठी महिला चेहऱ्याला संधीची जोरदार चर्चा
सोलापूर शहर प्रतिनिधी: सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर न केल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या जागेसाठी भाजपकडून महिला उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, पक्षाच्या ‘धक्का तंत्रा’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचक वक्तव्यांनी राजकीय चर्चांना आणखी रंग चढला आहे. भाजपकडून अंतिम क्षणापर्यंत उमेदवारीचा सस्पेन्स कायम ठेवण्यात येत असून, यामागे पक्षांतर्गत गटबाजी टाळण्याची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.
राज्यसभा निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रा. ज्योती वाघमारे यांना अचानक उमेदवारी देत सर्वांनाच धक्का दिला होता. त्याच धर्तीवर आता सोलापूर विधान परिषदेसाठीही पुरुष इच्छुकांऐवजी महिला उमेदवाराला संधी देण्याचा गंभीर विचार भाजपश्रेष्ठींकडून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या राजकीय वर्तुळात डॉ. श्रद्धा जवंजाल, रश्मी बागल आणि राजश्री नागणे या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. महिला आरक्षण, महिला नेतृत्व आणि नव्या चेहऱ्याला संधी असा संदेश देण्यासाठी भाजपकडून महिला उमेदवाराचा प्रयोग होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
दरम्यान, राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकांबाबत महायुतीत काही ठिकाणी अद्याप तिढा कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली बैठकीनंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे मतदारसंघांबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर जागावाटपावर जवळपास सहमती झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर सोलापुरातही भाजप ‘शिंदे पॅटर्न’ राबविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना अंतिम क्षणापर्यंत उमेदवाराचा चेहरा गुप्त ठेवण्याची रणनीती भाजप अवलंबत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता भाजपचा अंतिम ‘सरप्राइज चेहरा’ कोण असणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पारडे सध्या जड मानले जात असले तरी पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी उमेदवाराचा निर्णय गोपनीय ठेवण्यात आला आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच भाजपचा अंतिम उमेदवार जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






