Chandrapur News: ३५३ लाखांचा रस्ता पुन्हा खड्ड्यात! बामणी-कोठारी मार्गावरील निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त
गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने उचलले ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल; आता…
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत बामणी, काटवली, कोठारी व कोहपरा या गावाना जोडणाऱ्या सुमारे ५.१८ किमी रस्त्याचे दर्जोन्नतीकरण व डांबरीकरण व ०.८२० किमी सिमेंट रस्ता व नालीचे काम २०२२ मध्ये ३५३.६० लाख रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर ५ वर्ष रस्त्याची देखभाल व दुरुस्ती डिसेंबर २०२७ पर्यंत करण्याचा करार संबंधित बांधकाम कंपनीसोबत करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे योग्य तांत्रिक पद्धतीने भरले जात नाहीत. अनेक ठिकाणी उखडलेल्या रस्त्यावर केवळ ऑइलमिश्रित डांबराचा पातळ पापुद्रा टाकून दुरुस्ती केल्याचा देखावा करण्यात येत आहे. यामुळे काही दिवसांतच हे डांबर निघून पुन्हा खड्डे निर्माण होत आहेत. या कामावर संबंधित विभागाचे अभियंते कधीही प्रत्यक्ष उपस्थित राहत नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.
अनुपस्थितीत अभियंत्यांच्या ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर असलेला २८.०९ लाख रुपयांच्या निधीचा अपव्यय होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. थातुरमातूर डागडुजीचे काम करून देखभाल व दुरुस्तीचा निधी घशात घालण्याचा प्रयत्न ठेकेदार अधिका-यांच्या सहकार्याने करीत आहेत काय, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.
ग्रामस्थांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच रस्त्याची दुरुस्ती तांत्रिक निकषांनुसार आणि दर्जेदार पद्धतीने करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित पाहणी करावी आणि निकृष्ट काम थांबवून दर्जेदार दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.






