Chandrapur News: चिखलात अडकले शेतकऱ्यांचे पाय! चंद्रपुरातील पांदण रस्त्यांची दुरवस्था, शेतीची कामे ठप्प
महसूल विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात विविध योजनांमधून आतापर्यंत ६ हजार ०२० पांदण रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, १ हजार ३६७ कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच मुख्यमंत्री शेतकरी बळीराजा पांदण रस्ता योजनेअंतर्गत २५७ नवीन रस्त्यांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. शासनाच्या आकडेवारीत हजारो रस्ते पूर्ण झाल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये जुन्या पांदण रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. धान लागवडीच्या हंगामात दररोज शेतात जावे लागत असल्याने खराब रस्त्यांचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यांवर दलदल निर्माण झाली आहे. बैलगाडी किंवा ट्रॅक्टर घसरल्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने पांदण अरुंद झाली असून, वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि महसूल विभागाकडे दुरुस्तीची मागणी केली. मात्र, अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकण्यापलीकडे कोणतीही प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती झाली असती, तर शेतकऱ्यांचा मोठा त्रास टळला असता, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, प्रशासनाचे म्हणणे आहे की विविध योजनांमधून टप्प्याटप्प्याने पांदण रस्त्यांची कामे सुरू असून उर्वरित कामांनाही गती देण्यात येत आहे. मुख्यमंत्री शेतकरी बळीराजा पांदण रस्ता योजनेतून विधानसभा स्तरावर रस्त्यांचे नियोजन केले जात असून, आवश्यक निधी उपलब्ध होताच कामे पूर्ण केली जातील, अशी माहीती प्रशासनाकडून देण्यात आली.
शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी व शेतमाल ने-आण करण्यासाठी पादण रस्ते अत्यत महत्वाचे आहेत. मात्र सध्या पांदण रस्त्यांची स्थिती अत्यंत गंभीर असून त्या रस्त्यावरून बैलगाडी नेणे तर कठिणच. शिवाय माणूस चालत जाणेही अवघड झाले आहे. यंदा पाऊस कमी पडले असले तरी रस्त्यावर चिखलमय स्थिती निर्माण झाली आहे. काही पांदण रस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन मार्गक्रमण करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. – मंगेश बोरकर, शेतकरी, रत्नापूर, ता. सिंदेवाही
जिल्ह्यातील काही भागांत अवैध रेती वाहतुकीसाठी अवजड ट्रॅक्टर व ट्रकांचा वापर होत असल्याने अनेक पांदण रस्ते खचले आहेत. सततच्या जड वाहतुकीमुळे रस्त्यांवर खोल खड्डे पडले असून, पावसाळ्यात त्यांचे चिखलात रूपांतर होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर काही ठिकाणी प्रशासनाकडून दुरुस्ती होत नसल्याने काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येत श्रमदानातून मुरूम टाकून व पाण्याचा निचरा करून पांदण रस्ते तात्पुरते वाहतुकीयोग्य केले.






