Raigad News: माथेरानमध्ये घोड्यांच्या विष्ठेवरून पर्यावरणाचा प्रश्न; हरित लवाद काय निर्णय देणार? 16 ऑगस्टला महत्त्वाची सुनावणी
माथेरानमधील सुनील शिंदे आणि केतन रामाणे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे एक याचिका दाखल केली आहे. त्यात माथेरानमधील घोड्यांची विष्ठा ही पर्यावरणाला धोका निर्माण करणारी आहे, असे मत मांडले आहे. त्या याचिकेनंतर हरित लवादाने घेतलेल्या सुनावणीनंतर माथेरान नगरपरिषदेला आपले मत प्रतिज्ञापत्र स्वरूपात मांडण्याचे आदेश जून महिन्यात झालेल्या सुनावणीमध्ये दिले होते. त्यानंतर माथेरान नगरपरिषदेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हातगाड्यांच्या ऐवजी टप्प्याटप्प्याने ई-रिक्षा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जर या न्यायाधिकरणाने घोड्यांच्या विष्ठेचे संकलन करणे तसेच वाहतूक करण्यासाठी ई-टेम्पो (विद्युत मालवाहू वाहन) आणि यांत्रिक रस्ते स्वच्छता वाहने चालविण्यास परवानगी दिल्यास अधिक चांगल्या प्रकारे ही सर्व कामे कमी वेळात पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. नगरपरिषद घोड्यांच्या विष्ठा व्यवस्थापनाची योजना अधिक कार्यक्षम आणि वैज्ञानिक पद्धतीने राबवू शकेल.
माल वाहतुकीसाठी ई-टेम्पो सुरू झाल्यास सध्या मालवाहतूक करणाऱ्या टट्टूची गरज कमी होईल. त्यामुळे माथेरानमधील घोड्यांची संख्या आणि त्यांच्यामुळे निर्माण होणा-या विष्ठेचे प्रमाणही कमी होईल. तर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी घोडे हे माथेरानमधील अत्यावश्यक आणि प्रमुख वाहतुकीचे साधन राहतील, त्यामुळे कोणतीही उपाययोजना व्यवहार्य, अंमलात आणण्यास सक्षम आणि प्रवासी वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम करणारी नसावी, असे नमूद केले आहे.
या विषयी हरित लवाद यांच्याकडे एक समिती गठीत करण्यात आली आहे. पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन अशी ही समिती त्यावर निर्णय घेणार आहे. या समितीने माथेरानमधील हवा, पिण्याचे पाणी, माती आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादास काही सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून देखील याबाबत अभ्यास सुरु असून १६ ऑगस्ट रोजी या याचिकेची पुढील सुनावणी राष्ट्रीय हरित लवाद घेणार आहे.






