उद्योगमंत्री उदय सामंत यांचा नेत्यांना सल्ला (Photo Credit- X)
संभाजीनगर जिल्ह्यातील मतदार पुनरीक्षण मोहीम कामाचा आढावा घेण्याच्या उद्देशाने संत एकनाथ रंगमंदिरात पदाधिकाऱ्यांचा माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. निवडणूक आयोगाने सुरू केलेली एसआयआर मोहीम, बीएलए नियुक्ती, संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आदींचा आढावा घेण्यासाठी मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी छत्रपती संभाजीनगरातील पूर्व, पश्चिम आणि मध्य या तीन विधानसभा मतदारसंघाचा आढावा त्यांनी घेतला.
यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, माजी खासदार राहुल शेवाळे, संपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, नगरसेवक त्र्यबंक तुपे, हर्षदा शिरसाट उपस्थित होते. सामंत म्हणाले, शिवसेनेचा मेळावा म्हटलं की घोषणाबाजी आणि उत्साहाने भरलेला असतो, मात्र आजचा मेळावा तणावपूर्ण वातावरणात पार पडतोय, याला शिवसैनिक आणि नेते जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले, तीन विधानसभा मतदारसंघात बीएलए नियुक्तीचे काम २५ ते ५० टक्केच झालेले आहे. तिन्ही मतदारसंघ मिळूनही शंभर टक्के काम होत नाही, असेही म्हणाले.
यावेळी शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत, विजय वाघचौरे, शुभम काळे यांनी मतदारसंघातील कामाची माहिती सादर केली. एकाही मतदारसंघात १०० टक्के काम झाले नसल्याचे ऐकून मंत्री सामंतांनी नाराजी व्यक्त केली. हे पक्षाचे काम आहे, सर्वांची सांधिक जबाबदारी आहे. मात्र आपण सर्व त्यास ‘हलक्यात’ घेत आहात. २ महिन्यात बीएल नेमणूकीचे काम २५ टक्के झाले आहे. साहेबांना काय सांगायचे., असेही ते म्हणाले, खासदार भुमरे यांनी १५ दिवसात १०० टक्के काम पूर्ण करण्याचा शब्द सर्वांच्या वतीने दिला.
माजी खासदार शेवाळे यांनी सांगितले की, भाजपमध्ये मतदारसंघात राहणारे व्यक्ती, मोदी, अमित शहा, हेसुद्धा मतदार यादीचे प्रमुख आहेत. ही सिस्टीम भाजपची आहे. ते जरी पदावर असले तरी मतदार यादीची जबाबदारी त्या प्रमुख नेत्यावर टाकलेली आहे. एसआयआर मोहिमेच्या कामाची आढावा घेत असताना, पक्षातील पदाधिका-यांच्या कामाच्या फेरतपासणीचा आढावा घेण्यात येत आहे, जे काम करणार नाही, त्यांची नावेही पदाधिकाऱ्यांच्या यादीतून वगळली जाईल, अशी सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे.
शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत यांनी मध्य विधानसभा मतदारसंघात ३२० बुथ असून, १६१ कव्हर केले, २३४ बीएलए नेमले, अशी माहिती सादर केली, तर मंत्री सामंत यांनी त्यांची आकडेवारी खोडून काढली, आपल्या मतदारसंघात बीएलए नियुक्ती २३४, एकूण बुथ कव्हर १६१ आहेत. कव्हर न केलेल्या बुथची संख्या १५९ आहे, तुमचा एकूण रिपोर्ट ५० टक्के असल्याचे सांगितले., त्यावर या मतदारसंघात १०० बुध हे पूर्ण मुस्लिम भागातील असल्याचे राजूपत म्हणाले. त्यावर एसआयआरचा मूळ उद्देश तोच आहे, मुस्लिम भागातच बांग्लादेशी, रोहिंग्यांची नावे असतात, आणि तीच आपल्याला रद्द करायची आहेत. ज्या भागातील संशयास्पद नावे वगळायची आहेत, तिथेच बीएलए नेमले नाही तर फायदा नाही, असे सांगत कानउघडणी केली.
“घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ !” छ. संभाजीनगर महापालिकेच्या कारभारावरून अंबादास दानवे संतप्त






