Sanjay Raut PC: 'मोदींचा विकास कुणी समजावून सांगितला, तर मीही भाजपमध्ये जाईन'; संजय राऊतांचे खुले आव्हान
राज्यात विधान परिषद निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत वेगवान घडामोडी सुरू आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची घोषणा होत असताना शिवसेना संजय राऊत यांनी भाजप, महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपच्या उमेदवारीच्या धोरणावर, पक्षांतराच्या राजकारणावर तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांची नावे वगळण्याच्या मुद्द्यावरही टीका केली.
दरम्यान भाजपकडून विधानपरिदेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे अरूण लखानी यांच्या उमेदवारीवरही प्रतिक्रीया देताना म्हटले की,”लखानी हे जन्मापासून संघाचे कार्यकर्ते आहेत. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे वेगळे नसून एकाच विचारसरणीचे भाग आहेत. आम्हीदेखील आमच्या संघटनांमधील कार्यकर्त्यांना संधी देतो.”
भाजपच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत म्हणाले, “भाजपचे स्वतःचे असे काही उरलेले नाही. अनेक राज्यांतील मुख्यमंत्री, मंत्री आणि नेते हे काँग्रेसमधून गेलेले आहेत. भाजपकडे स्वतंत्र नेतृत्व आणि विचार किती आहेत, हा खरा प्रश्न आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दाव्यांवर टीका करताना राऊत यांनी आव्हानात्मक भूमिका घेतली. “कोणी मला मोदींचा विकासाचा मुद्दा समजावून सांगितला, तर मीही भाजपमध्ये जाईन. मोदींनी नेमके काय केले, हे सांगा. मात्र पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी सरकारच्या कामगिरीबाबत मी ठोसपणे सांगू शकतो,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर बोलताना राऊत म्हणाले, “आधी देवेंद्र फडणवीस आम्हाला तुरुंगात टाकत होते, आता मोदी सरकार तीच भूमिका पार पाडत आहे.” दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुमारे ८० लाख महिला अपात्र ठरल्याच्या चर्चेवरही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. “निवडणुकीत मतदान मिळवण्यासाठी महिलांना पैसे देण्यात आले. आता त्यांच्याकडून पैसे परत मागितले जाणार असतील, तर त्या महिला ते पैसे कुठून आणणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही लाडके भाऊ आहेत. पण सरकारने महिलांच्या भावनांशी खेळ करू नये,” असेही ते म्हणाले. मोदींवरील टीका अधिक तीव्र करताना राऊत म्हणाले, “मोदींचा एखादा विचार मला पटला, तर मी त्यांचे भजनही करेन. पण सध्या जनतेसमोर जे चित्र आहे, त्यात सरकारची आश्वासने आणि वास्तव यात मोठी तफावत दिसून येते.”






