कर्जतमध्ये टोरंट जलविद्युत प्रकल्प विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पाविरोधात स्थानिकांसह सर्व शेतकरी विरोधात उभे आहेत. हा प्रकल्प पाली तर्फे कोतल खलाटी, साई डोंगर, भालिवडी, ढाक बहीरी परिसरात होणार आहे.bप्रकल्पासाठी वनविभागाच्या सुमारे 600 एकर जमिनीचा वापर होणार असून काही लाख झाडांची कत्तल होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रस्तावित असलेल्या टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधात विरोधाची तीव्रता वाढत असून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.
गुरुवारी पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी तहसीलदार, प्रांत अधिकारी, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाला निवेदने देत प्रकल्प तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली. कर्जत पंचायत समिती उपसभापती चित्रा ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे वतीने निवेदन प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिले.यावेळी शिवसेना कर्जत तालुका प्रमुख बाजीराव दळवी,माजी उप सभापती पंढरीनाथ राऊत,युवासेनेचे संपत हडप,तसेच टोरंट प्रकल्प परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
शिवसेना पक्षाने दिलेल्या निवेदनात या प्रकल्पामुळे पाली आणि पोटल ग्रामपंचायत हद्दीतील जनजीवन विस्कळीत होणार असून विशेषतः आदिवासी लोकांचे मोठे नुकसान होईल. त्यांच्या जमिनी, उपजीविका आणि नैसर्गिक साधनसंपत्ती धोक्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यास वन्यजीवांचे स्थलांतर होऊन ते मानवी वस्तीत येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे व घरांचे नुकसान होऊ शकते. प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या वीज व पाण्याचा स्थानिकांना फायदा न होता तो इतर शहरांना पुरवठा केला जाणार असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकल्पामुळे भविष्यात कर्जत तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प तात्काळ थांबवावा, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.






