File Photo : Kolhapur
कोल्हापूर : राज्यात महायुतीने बंपर यश मिळवल्यानंतर आता महायुती सरकारमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोणाला मंत्रिपद मिळणार? याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोण सांभाळणार? याकडेही जिल्हावासियांच्या नजरा लागल्या आहेत. कोल्हापूरला शिवसेनेच्या माध्यमातून अजून एकदाही पालकमंत्रिपद मिळाले नाही. मात्र, यंदा तीन जागा जिंकल्यामुळे शिवसेनेकडे पालकमंत्री पद जाणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेदेखील वाचा : मोठी बातमी ! राज्यात आज होणार सरकार स्थापन; शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण, तब्बल 4 हजार जवान…
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात दमदार यश मिळवलेल्या महायुतीने इतिहासात पहिल्यांदाच 10 विधानसभा सदस्य निवडून आणत निर्विवाद वर्चस्व मिळवले. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पालकमंत्रिपद भूषवले आहे. मात्र, आता जिल्ह्यातील 3 जागा धनुष्यबाणावर निवडून आणत ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाला पालकमंत्रिपद हा यापूर्वीचा फॉर्म्युला असल्यामुळे शिवसेनेचे जिल्ह्यातील आमदार राजेश क्षीरसागर, प्रकाश अबिटकर, चंद्रदीप नरके यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून अमल महाडिक आणि राष्ट्रवादीकडून आमदार हसन मुश्रीफ मंत्रिपदाच्या रेसमध्ये असणार आहेत.
दरम्यान, 2019 च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सतेज पाटील दुसऱ्यांदा पालकमंत्री झाले, तर राज्यातील दोन पक्षांत झालेल्या फुटीनंतर अस्तित्वात आलेल्या महायुती सरकारमध्ये पहिल्यांदा दीपक केसरकर आणि त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळले. यंदाच्या विधानसभेत शिवसेनेच्या तीन जागा निवडून आल्यानंतर शिवसेना जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर दावा करणार आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून नावावर एकमत
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला चांगले यश मिळाले आहे. त्यात या महायुतीने बहुमताचा आकडाही पार केला आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असून, मोठा पक्ष ठरला आहे. असे असताना मुख्यमंत्रिपदावरून शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये चढाओढ सुरु असतानाच आता भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या नावावर एकमत झाल्याची माहिती दिली जात आहे.
विनोद तावडे केंद्रीय पातळीवर असणार
भाजप नेते विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशसारख्या राज्याची जबाबदारी देण्यात आल्याने ही शक्यता आणखी बळकट झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे येत्या जानेवारीमध्ये निवडले जाणार आहेत. अलीकडील काही घडामोडींवरून विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तावडे यांची प्रमोद महाजन यांच्या पद्धतीने काम करणारा नेता म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
हेदेखील वाचा : Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द हटवले जाणार नाहीत