लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू (फोटो - istockphoto)
लातूर : गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा बसत आहे. त्यात निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
लक्ष्मण दादाराव भंडारे (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. लातूर आणि परिसरात एप्रिलच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचा प्रकोप वाढत असून, तापमानाचा पारा ४२.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. किमान तापमानही ३१.५ अंशांवर गेल्याने रात्रदिवस नागरिक हैराण झाले आहेत. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास लक्ष्मण भंडारे शेतात काम करत असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने औराद शहाजानी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने निलंग्याकडे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, उपचारापूर्वीच भंडारे यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, भंडारे यांचा मृत्यू हा उष्माघातामुळे झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याबाबत डॉ. मल्लिकार्जुन शंकद यांनी सांगितले की, दिवसभर उन्हात काम केल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली असावी. त्यामुळे तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला असण्याची शक्यता असून, हा उष्माघाताचा प्रकार असल्याचे दिसते.
उष्यावर पावसाचा शिडकाव
गेल्या आठवड्यापासून राज्यात कमालीचा उकाडा जाणवत असून, मंगळवारी मात्र या उष्मावर पावसाचा शिडकाव पडला. त्यामुळे नागरिकांना किंचित दिलासा मिळाला. मंगळवारी सकाळच्या सुमारास मुंबई महानगरासह राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला.
संभाजीनगरमध्ये उष्माघात कक्षाची स्थापना
मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमान ४१ अंशाच्या वर पोहोचले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे. अशावेळी उष्माघाताची शक्यता अधिक वाढते. यामुळे पुढील धोके लक्षात घेता जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे जिल्हाभरातील ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.






