Maharashtra Breaking News Updates Today:
10 Mar 2026 10:05 AM (IST)
राजकारण, भ्रष्टाचार आणि देशांतर्गत व्यवस्थेतील रचनेचा अभाव यामुळे शाहझेब भट्टीने पाकिस्तान क्रिकेटमधून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सियालकोटमध्ये जन्मलेल्या शाहझेब भट्टीने २०२४-२५ च्या कायद-ए-आझम ट्रॉफीच्या अंतिम फेरीत सियालकोट प्रदेशाच्या पेशावर प्रदेशावर एका विकेटने रोमांचक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती, एका रोमांचक सामन्यात त्याने नाबाद ३२ धावा केल्या होत्या. तथापि, नंतर त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आणि त्याने ४० सामने बेंचवर घालवले. या तरुण खेळाडूने सांगितले की त्याचे स्वप्न पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे होते, परंतु देशांतर्गत रचनेतील वास्तवामुळे त्याला खेळातून दूर जावे लागले.
10 Mar 2026 09:40 AM (IST)
पुणे: गणेशखिंड रस्त्यावरील पुणे विद्यापीठ चौकात नव्याने बांधण्यात आलेल्या दुमजली उड्डाणपुलाचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसांतच या पुलाच्या कामातील दर्जावर नगरसेवक सनी निम्हण यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सोशल मीडियावर या पुलाचा फोटो शेअर करत निम्हण यांनी पुलाच्या रचनेत त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. "हा फ्लायओव्हर आहे की फ्लॉओव्हर (त्रुटी असलेला पूल)?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुलाचे वास्तव मांडताना त्यांनी कामाच्या दर्जावर सडकून टीका केली आहे.
10 Mar 2026 09:35 AM (IST)
नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतींवर होऊ लागला आहे. भारतात ७ मार्च रोजी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यापासून नागरिकांमध्ये गॅस टंचाईची भीती पसरली होती. मात्र, ही परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली असून देशांतर्गत तेल शुद्धीकरण कारखान्यांना (Refineries) एलपीजी उत्पादन वाढवण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा एलपीजी आयातदार देश असल्याने, युद्ध लांबल्यास पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने स्थानिक पातळीवर उत्पादन वाढवून संभाव्य टंचाई रोखण्याची रणनीती आखली आहे. यामुळे आगामी काळात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.
10 Mar 2026 09:30 AM (IST)
मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय किंवा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री खरेदी करण्यासाठी १५ हजार रुपयांचे वित्तीय सहाय्य देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांना छोटेखानी व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक बळ मिळणार असून, त्यांना कोणावरही अवलंबून न राहता सन्मानाने जीवन जगता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
10 Mar 2026 09:30 AM (IST)
नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीने प्रतिबॅरल १२० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. याचे तीव्र पडसाद भारतीय बाजारपेठेत उमटले असून, सोमवारी मुंबई शेअर बाजारात मोठी पडझड झाली, तर रुपयाने आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठली आहे.
बाजारातील स्थिती:
शेअर बाजार: सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
रुपयाचे मूल्य: रुपया ९२.३६ या ऐतिहासिक विक्रमी नीचांकावर पोहोचला आहे.
तेलाचे दर: २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच तेलाच्या किमतीत इतकी मोठी वाढ झाली आहे.
10 Mar 2026 09:25 AM (IST)
मुंबई: राज्यातील महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या क्षेत्रातील हजारो हेक्टर गायरान जमिनी आता अधिकृतपणे राज्य शासनाच्या मालकीच्या होणार आहेत. या संदर्भातील महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या सुधारणा विधेयकाला सोमवारी विधानसभेने एकमताने मंजुरी दिली. या जमिनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांना सार्वजनिक उपयोगासाठी नि:शुल्क उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे सुधारणा विधेयक सभागृहात सादर केले. यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितले की, "राज्यातील २९ महानगरपालिका क्षेत्रांत ३ हजार ३७८ हेक्टर आणि २४७ नगरपरिषदांच्या क्षेत्रांत ४ हजार ५०९ हेक्टर अशी एकूण ७ हजार ८८७ हेक्टर गायरान जमीन उपलब्ध आहे. एकट्या पुणे महापालिका हद्दीत ८८६ हेक्टर गायरान जमीन आहे."
10 Mar 2026 09:20 AM (IST)
मुंबई: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आखाती देशांत अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. त्यांचा मुलगा, जो कुवेतमध्ये अडकला होता, तो आता सुरक्षितपणे मुंबईत परतला आहे.
काही दिवसांपूर्वी विशाखा सुभेदार यांनी एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. "माझा मुलगा कुवेतमध्ये अडकला असून त्याला सुखरूप परत आणा," अशी रडवेली विनंती त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज ठाकरे यांनाही केली होती. या व्हिडिओची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विशाखा सुभेदार यांना फोन करून मदतीचे आश्वासन दिले होते.
10 Mar 2026 09:15 AM (IST)
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथे वास्तव्यास असलेले भारतीय नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. या नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने ठोस धोरण आखावे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली.
जयंत पाटील यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा विषय उपस्थित केला. पश्चिम आशियातील तणाव वाढत असल्याने तेथील भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. "अनेक मराठी आणि भारतीय तरुण कामासाठी आखाती देशांत आहेत. युद्धाची व्याप्ती वाढल्यास त्यांना बाहेर काढणे कठीण होईल, त्यामुळे सरकारने आतापासूनच त्यांच्या सुटकेसाठी नियोजन करावे," असे पाटील यांनी यावेळी नमूद केले.
10 Mar 2026 09:10 AM (IST)
पुणे: पुणे महापालिका आयुक्तांनी आज सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १३ हजार ९९५ कोटी रुपयांचे भव्य अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. या अंदाजपत्रकात शहर विकास आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला असून, पाणीपुरवठा विभागाला सर्वाधिक निधी देण्यात आला आहे.
अंदाजपत्रकातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:
पाणीपुरवठा विभाग: २०७७ कोटी रुपये (सर्वात जास्त तरतूद)
पथ विभाग: १८६६ कोटी रुपये
घनकचरा व्यवस्थापन: १३९० कोटी रुपये
मलनिस्सारण प्रकल्प: १२१६ कोटी रुपये
प्राथमिक शिक्षण विभाग: ९७९ कोटी रुपये
वाहतूक नियोजन व प्रकल्प: ७४० कोटी रुपये
भवन रचना विभाग: ६५० कोटी रुपये
विद्युत विभाग: २६५ कोटी रुपये
उद्यान विभाग: २०५ कोटी रुपये
सांस्कृतिक केंद्र विभाग: १७१.३१ कोटी रुपये
समाज विकास: १४३.५० कोटी रुपये
आरोग्य विभाग: ८८ कोटी रुपये
नगर रचना नियोजन: ६४.५० कोटी रुपये
माहिती व तंत्रज्ञान: ५६.७३ कोटी रुपये
पर्यावरण विभाग: ५१.५९ कोटी रुपये
हेरिटेज सेल: २८.५० कोटी रुपये
शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ७४० कोटींची स्वतंत्र तरतूद करण्यात आली असून शिक्षण आणि पर्यावरणावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
10 Mar 2026 09:05 AM (IST)
न्यूझीलंडचा पराभव करून पुन्हा एकदा आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाने मैदानात जल्लोष केला. मात्र, या सेलिब्रेशन दरम्यान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची मैत्रीण महिका शर्मा यांच्या वागण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून त्यावरून वादाला तोंड फुटले आहे.
विजयानंतर महिका हार्दिकसोबत मैदानात फिरताना आणि नाचताना दिसली. यादरम्यान तिने हार्दिकला मिठी मारत त्याचे चुंबन घेतले, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच, खांद्यावर तिरंगा आणि गळ्यात पदक असलेला हार्दिक महिकासोबत बक्षीस वितरणाच्या मंचावर झोपल्याचेही एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. मैदानावरील या कृत्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून, नेटकऱ्यांनी या वर्तनावर कडक शब्दांत टीका केली आहे.
10 Mar 2026 09:00 AM (IST)
नाशिक: शहरातील गंगापूर रोड परिसरात घडलेल्या डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. या घटनेनंतर डॉ. मनीषा यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी धक्कादायक आरोप केले असून, त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांची सखोल चौकशी करण्याची मागणी नाशिक पोलिसांकडे केली आहे.
डॉ. मनीषा यांचा मृत्यू हा खरोखर आत्महत्या आहे की त्यांची हत्या करण्यात आली, याबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सखोल रीतीने करून सत्य समोर आणावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. नातेवाईकांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले असून, पोलीस आता या दिशेने काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
10 Mar 2026 08:58 AM (IST)
जागतिक वारसा स्थळ असलेले आणि सातारा जिल्ह्याचे भूषण मानल्या जाणाऱ्या कास पठारामुळे सातारा व जावली तालुक्यांतील पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात होणारी फुलांची पर्वणी संपल्यानंतरही, येथे बारमाही पर्यटन सुरू राहावे आणि स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कास पठार कार्यकारी समिती व ग्रामस्थ गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. मात्र, वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे या बारमाही पर्यटनाचे 'तीन तेरा' वाजले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
10 Mar 2026 08:50 AM (IST)
शरीरातील विषारी घटक घाम, लघवी आणि शौचावाटे बाहेर पडून जाते. पण बऱ्याचदा जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, तासनतास एका जागेवर बसून राहणे, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. आपल्यातील अनेकांना तासनतास लघवी रोखून धरण्याची सवय असते. पण लघवी रोखून धरल्यामुळे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. ज्याच्या परिणामामुळे किडनी आणि मूत्राशयात इन्फेक्शन वाढते. किडनी निकामी झाल्यानंतर शरीरातील रक्त शुद्ध होत नाही, ज्यामुळे अंगाला खाज येणे, चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे वेळीच लघवीला जाणे आवश्यक आहे. जास्त वेळ लघवी थांबवून ठेवल्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग, किडनी स्टोन, मूत्राशय कमकुवत होणे आणि किडनीवर जास्तीचा तणाव येतो. त्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवतात
10 Mar 2026 08:50 AM (IST)
India Share Market Update: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की, अमेरिका-इराण युद्धाचा शेवट जवळ येत आहे. युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहे. कधी शेअर बाजारात मोठी तेजी आहे, तर कधी मोठी घसरण. युद्धाचा शेअर बाजारावर परिणाम होत असल्याने गुंतवणूकदारांची धाकधूक देखील वाढली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिका-इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्यामुळे एक नवीन जागतिक संकट निर्माण झाले आहे. जगात कुठेही युद्ध सुरू झाले की, लोक सामान्यतः बॉम्बस्फोट, क्षेपणास्त्र हल्ले आणि सैन्य तैनातीवर लक्ष केंद्रित करतात. परंतु, प्रत्येक युद्धाचा आणखी एक पैलू असतो जो बहुतेकदा कमी दिसून येतो. हा पैलू म्हणजे त्याचा आर्थिक खर्च. इराणशी सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेच्या लष्करी कारवायांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.






