'...म्हणून लोकल उशीराने धावते', दिवा उड्डाणपुलावरून रेल्वे- सरकार आमनेसामने
दिवा जंक्शनवरील फाटकामुळे दररोज तब्बल ६० ते ७० लोकल गाड्या प्रभावित होत आहेत. प्रत्येक वेळी फाटक बंद झाले की, गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. सिग्नलिंगची साखळी विस्कळीत होते. संपूर्ण वेळापत्रक कोलमडते. पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत वेळ भरून काढण्यासाठी रेल्वेला अक्षरशः कसरत करावेत लागते. रेल्वेच्या अंतर्गत अंदाजानुसार, हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यास वक्तशीरपणात किमान ३ ते ४ टक्क्यांची वाढ होऊ शकते. म्हणजेच आज जो विलंब रोजचा नियम बनला आहे, तो मोठ्या प्रमाणात आटोक्यात येऊ शकतो असे रेल्वेचे म्हणणे आहे.
दिवा स्थानक हे मध्य रेल्वेवरील एक अत्यंत महत्त्वाचं जंक्शन आहे. येथून दररोज लाखो प्रवासी कळवा, मुंब्रा, शीळफाटाकडे प्रवास करतात. २०१७ साली या ठिकाणी पूर्व-पश्चिम जोडणारा रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) उभारण्याचं काम मोठ्या गाजावाजा करत सुरू झाल.
प्रारंभी जलदगतीने सुरू झालेलं हे काम काही महिन्यांतच थांबलं आणि त्यानंतर सात वर्षांचा काळ उलटून गेला तरी पूल आजही अर्धवट अवस्थेत उभा आहे.
पूर्वेकडील बाजूस काही खांब उभे राहिले, पण पश्चिमेकडील बाजूला अजूनही भूसंपादन न झाल्यामुळे काम सुरूच होऊ शकलेलं नाही.
सध्या फाटक बंद झाले की वाहनांच्या रांगा किलोमीटरपर्यंत पसरतात. रुग्णवाहिका अडकतात. कामगार उशिरा पोहोचतात. रेल्वेगाड्या थांबतात किंवा रेंगाळतात. हा प्रश्न केवळ स्थानिकांचा राहिला नसून, तो संपूर्ण उपनगरीय व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर घाला घालतो आहे. उड्डाणपूल पूर्ण होणे ही आता केवळ मागणी नाही, तर तातडीची गरज बनला आहे.
दिवा स्थानक हे उपनगरीय जाळ्यातील अत्यंत गर्दीचे केंद्र मानले जाते. येथे दररोज सुमारे ८९४ लोकल गाड्या धावतात. त्यापैकी ७० ते ७५ टक्के गाड्या येथे थांबतात. स्थानकावरील लेव्हल क्रॉसिंग दिवसातून सरासरी ३९ वेळा बंद होते. प्रत्येक वेळी वाहतूक ठप्प होते आणि रेल्वेचे वेळापत्रक ढासळते. राज्य सरकार या पत्राची किती दखल घेते आणि प्रत्यक्ष कामाला किती वेग देते, यावरच दिवा परिसरातील लाखो प्रवाशांचा रोजचा प्रवास अवलंबून आहे.






