Lalbaugcha Raja Visarjan 2025 (Photo Credit- X)
मुंबई: लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा इतिहासात पहिल्यांदाच विलंब झाला असला, तरी आता हा सोहळा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर राजाची भव्य मूर्ती तराफ्यावर यशस्वीरित्या चढवण्यात आली आहे आणि ती आता विसर्जनासाठी समुद्रात मार्गस्थ झाली आहे. या सोहळ्यात लालबागच्या राजाची शेवटची आरती पार पडली. या आरतीसाठी अनंत अंबानी उपस्थित होते. रविवारी रात्री ८ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या राजाच्या मूर्तीला समुद्रातील उंच लाटा आणि काही तांत्रिक अडचणींमुळे विसर्जनासाठी विलंब झाला होता.
मात्र, मंडळाचे कार्यकर्ते, पोलीस प्रशासन आणि अथक प्रयत्नांमुळे ही मोठी अडचण दूर झाली. आता ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात कोट्यवधी भाविकांच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.
मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी या परिस्थितीवर स्पष्टीकरण दिले. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “लालबागच्या राजाचे विसर्जन भरती आणि ओहोटी वर अवलंबून असते. आम्ही चौपाटीवर पोहोचण्यापूर्वीच भरती सुरू झाली होती. त्यामुळे, भरती ओसरण्याची वाट पाहणे आवश्यक होते.” सुधीर साळवी यांनी रात्री साडे दहा ते अकरा वाजता विसर्जन पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली. त्यांनी पुढे सांगितले की, “लालबागचा राजा करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे कोणतीही घाई न करता योग्य वेळेची वाट पाहणे महत्त्वाचे होते. उशिरा झालेल्या विसर्जनामुळे आम्ही सर्व भाविकांची दिलगिरी व्यक्त करतो.” या विलंबामुळे मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल साळवी यांनी त्यांचे आभार मानले. माध्यमांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अखेर, अथक परिश्रमांनंतर राजाचा निरोप समारंभ पूर्ण होत असल्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरवर्षीप्रमाणे, दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे सकाळी 8 वाजण्यापूर्वी लालबागचा राजाच्या मूर्तीचे खोल समुद्रात विसर्जन करण्याची तयारी सुरू होती. मात्र, रविवारी सकाळी आलेल्या समुद्रातील जोरदार भरतीमुळे आणि विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन तराफ्याच्या तांत्रिक अडचणींमुळे मूर्तीला तराफ्यावर चढवणे कठीण झाले. यामुळे, गेल्या आठ तासांपासून लालबागचा राजाची मूर्ती समुद्रातच होती.