सौजन्य - नवराष्ट्र टीम
नीरा : देशातील विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला नीरा येथील विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. तसेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नीरा ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करत संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
सभेत वक्त्यांनी सांगितले की, लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब असून, विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी लाठीमाराचा मार्ग स्वीकारणे कोणत्याही लोकशाही सरकारला शोभणारे नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
तसेच देशाच्या भवितव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग अवलंबला जात असेल, तर ती चिंतेची बाब असल्याचे नीराचे उपसरपंच राजेश काकडे यांनी म्हटले नमूद केले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी विद्यार्थी आणि आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेऊन घोषणाबाजी केली. “लोकशाहीचा हक्क आमचा अधिकार”, “विद्यार्थ्यांवरील अन्याय बंद करा” आणि “लाठीमाराचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सभेनंतर विद्यार्थ्यांनी जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांच्याकडे निवेदन सादर केले.
हे सुद्धा वाचा : दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या, धक्कादायक कारणही आलं समोर; चौघांना अटक
या निषेध सभेला नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, सदस्य संदीप धायगुडे, अनिल चव्हाण, अभिषेक भालेराव, सुनील चव्हाण, अनंता शिंदे, ॲड. आदेश गिरमे, दादा गायकवाड, डॉ. श्रीणीक शहा, सचिन मोरे, मंगेश ढमाळ, राजेंद्र बरकडे, शांतिकुमार कोठडीया, सुरेश वीर, महेश जेधे, दयानंद चव्हाण, अकबर सय्यद, सिकंदर शेख, शशिकांत जगदाळे, भगवान गोफणे, अजित सोनवणे, आदिराज कोठडीया, स्वप्निल कांबळे, अमोल घुले, प्रसाद सोनवणे, विद्यार्थी पवन बिचकुले आणि सक्षम मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सभेच्या शेवटी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा तीव्र निषेध व्यक्त करत लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले.






