सौजन्य - सोशल मिडीया
देवळा : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अशातच आता देवळा तालुक्यातील वाखारी येथे बुधवारी (दि. २२) सायंकाळी एका तरुण विवाहित महिलेने दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत विवाहितेच्या पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वाखारी (ता. देवळा) येथे मनीषा जयेश वाघ (वय ३०) या विवाहित महिलेने आपल्या दोन मुली सिद्धी जयेश वाघ (वय ७), खुशी जयेश वाघ (वय ३) यांच्यासह घराजवळील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. रात्री उशिराने तिघांचे मृतदेह मिळून आल्यावर शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिच्या व दोन्ही मुलींच्या मृत्यूस सासरकडील मंडळी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी विवाहितेचा पती, सासू, सासरे, दीर आणि नणंदेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर सायंकाळी वाखारी येथील स्मशानभूमीत तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदा पाटील ह्या करत आहेत.
सासरच्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
दोन मुली झाल्याने व माहेरून पैसे आणण्यासाठी छळ करून मयत मनीषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भास्कर जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती जयेश वाघ, सासरा रमेश वाघ, सासू सुनंदा वाघ, दीर विकी वाघ आणि नणंद सविता बच्छाव यांच्याविरुद्ध चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पतीसह चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.






