राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस होणार कमी, IMD चा अंदाज (Photo Credit- AI)
मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या ऑगस्ट-सप्टेंबर 2026 च्या दीर्घकालीन अंदाजानुसार, देशभरात मान्सूनच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एल निनोचा प्रभाव मान्सून अखेरपर्यंत पाठलाग करताना दिसत असून, महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, मध्य भारत आणि द्वीपकल्पीय भारतातील काही भागांमध्ये सामान्य ते किंचित जास्त पावसाची शक्यता असल्याने राज्यातही विभागनिहाय मोठी तफावत दिसू शकते.
राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचे खंड, दीर्घ विश्रांतीचे टप्पे आणि काही ठिकाणीच मुसळधार सरी अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसावर विशेष लक्ष ठेवावे लागणार असून, खरीप पिकांसाठी पाण्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरणार आहे. सप्टेंबरमध्ये सकारात्मक इंडियन ओशन डायपोल विकसित झाल्यास काही भागांना दिलासा मिळू शकतो. मात्र, एकूण हंगामात पावसाचे वितरण अत्यंत असमान राहू शकते.
जास्त तापमानामुळे पिकांवरील ताण वाढणार
पावसाची तूट कायम राहण्याचा धोका नाकारता येत नाही. तापमानाच्या बाबतीतही महाराष्ट्रातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाष्पीभवन वाढून मातीतील ओलावा कमी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Maharashtra Rain Update) अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, हवामान विभागाने विविध भागांसाठी इशारे जारी केले आहेत. नद्या, धरणे आणि जलाशयांतील पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासन सतर्क झाले आहे.
मुंबई, ठाणे आणि रायगडला यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई केंद्राने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील तीन तासांचा यलो नाऊकास्ट अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






