सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा! खरीप हंगामासाठी खतांचा मुबलक साठा उपलब्ध
Satara Agricultural News: खरीप हंगाम २०२६च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून आगामी काळात कोणतीही टंचाई भासणार नाही, अशी खात्री जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकरी निर्धास्तपणे नियोजन करू शकणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्रांमध्ये युरिया, डीएपी, एमओपी, सुपर फॉस्फेट (एसएसपी) आणि संयुक्त खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. मार्च २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण ५७,९९० मेट्रिक टन खतसाठा विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये युरिया १२,०७८ मे. टन, डीएपी ६,१९० मे. टन, एमओपी ३,७९१ मे. टन, सुपर फॉस्फेट ८,९४८ मे. टन आणि संयुक्त खते २६,९८३ मे. टन इतका साठा आहे.
याशिवाय, खरीप हंगाम २०२६ साठी सातारा जिल्ह्याला एकूण १,०२,३०० मेट्रिक टन खत पुरवठ्याचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये युरिया ३८,२०० मे. टन, डीएपी ९,८०० मे. टन, एमओपी ४,२०० मे. टन, सुपर फॉस्फेट ११,८०० मे. टन आणि संयुक्त खते ३८,३०० मे. टन इतक्या खतांचा समावेश आहे. खतांचे सुरळीत वितरण करण्यासाठी संबंधित कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, एखाद्या विशिष्ट खतावर अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करावा. माती परीक्षण करून जमिनीच्या गरजेनुसार योग्य खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल आणि जमिनीचा पोतही सुधारेल.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्रांची नियमित तपासणी सुरू असून खतांची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. जर कोणी खतांची जादा दराने विक्री, अनधिकृत साठेबाजी, खतांचे लिकिंग किंवा औद्योगिक वापर करताना आढळले, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कृषी विभागाने दिला आहे.






