एवढं मोठं प्रकरण झालं, रवींद्र चव्हाण होते कुठे?' डॉक्टर मारहाण प्रकरणावरून राजू पाटलांचा सवाल
या घटनेनंतर राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन शास्त्रीनगर रुग्णालयातील आरोग्य सुविधा, डॉक्टरांची संख्या, उपचार व्यवस्था आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध करतानाच रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
राजू पाटील म्हणाले, “रमेश म्हात्रे यांनी केलेल्या कृत्याचे आम्ही कोणत्याही परिस्थितीत समर्थन करत नाही. कायदा हातात घेणे चुकीचेच आहे. मात्र, त्या दिवशी एका रुग्णाच्या नातेवाईकांची मानसिक अवस्था काय होती, रुग्णालयात त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले, याचाही विचार होणे आवश्यक आहे. लोकांच्या उद्रेकामागील कारणे समजून घेतली पाहिजेत.”
यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट टीका करत विचारले, “एवढं मोठं प्रकरण घडलं, पण रवींद्र चव्हाण कुठे होते? सहा दिवस पाऊस होता, आज रवी दिसला; पण आमच्या डोंबिवलीचा ‘रवी’ कुठेच दिसला नाही.” राजू पाटील यांनी पुढे म्हटले की, “रवींद्र चव्हाण चार वेळा आमदार राहिले, वैद्यकीय शिक्षण मंत्रीही होते. त्यांनी या रुग्णालयासाठी नेमकं काय केलं? गेली ३० वर्षे या शहरात सत्ता असणाऱ्यांनी नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा का उपलब्ध करून दिल्या नाहीत?”
मनसे सत्तेत आल्यापासून अवघे सहा महिने झाले असतानाही सर्व प्रश्न आम्हालाच विचारले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “आम्ही केडीएमसीमध्ये सत्तेत येऊन अवघे सहा महिने झाले आहेत. आम्हाला पाच वर्षे काम करू द्या, त्यानंतर आमचा जाब विचारा. पण जे लोक तीन दशकांपासून सत्तेत होते, त्यांना कोणी प्रश्न का विचारत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
डोंबिवलीतील नागरी सुविधांवर बोलताना राजू पाटील यांनी पोस्टमार्टम केंद्र, स्मशानभूमी आणि आरोग्य सुविधांच्या नियोजनावरही नाराजी व्यक्त केली. शहराच्या मध्यभागी पोस्टमार्टम कक्ष ठेवण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत, रामनगर येथील स्मशानभूमी स्थलांतरित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, डॉक्टर मारहाण प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, त्याचबरोबर रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राजू पाटील यांच्या वक्तव्यामुळे हे प्रकरण आता अधिकच राजकीय रंग घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
Raj Thackeray on KDMC: कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप; “बाळासाहेब आज असते तर…”






