ठाण्यात आंबा महोत्सावाला नागरिकांकडून पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूसला बाजारात मोठी मागणी आहे. मात्र सध्या कर्नाटकी आंबा हा हापूस आंबा म्हणून विक्री होत असल्याने ग्राहकांची फसणवूक होत आहेच शिवाय अस्सल हापूस विक्रेत्यांना सुद्धा याचा मोठा फटका बसत आहे. हीच बाब लक्षात घेत ग्राहकांना खऱ्या हापूस आंब्याची चव चाखता यावी त्याचबरोबर हापूस आंब्याची विक्री करण्यांना योग्य तो हमीभाव मिळावा यासाठी ठाण्यात आंबा महोत्सावाचे आयोजन आमदार संजय केळकर यांनी केले आहे. संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने पुरस्कृत केलेल्या १८व्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन नुकतेच पार पडले आहे. या महोत्सावाचे उद्घाटन हास्यजत्रा फेम दत्तू मोरेच्या हस्ते करण्यात आले.
परराज्यातील आंबा कोकणातला हापूस आंबा म्हणून ग्राहकांच्या माथी मारला जातो, मात्र संस्कार संस्थेच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या या महोत्सवात कोकणातला अस्सल हापूस आंबा उपलब्ध झाला आहे. अगदी कोविडच्या काळातही हा महोत्सव झाला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा महोत्सव म्हणजे चळवळ असून यातून शेतकऱ्यांना हात दिला जात असून ग्राहकांनाही वाजवी दरात अस्सल दर्जेदार हापूस आंबा मिळत आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.
आंबा महोत्सवाचे आयोजक आमदार संजय केळकर म्हणाले, मी दोन दिवस कोकणामध्ये जाऊन आलो. जरा हवामान बदलले की आंब्यावर परिणाम होतो, म्हणून शेतकरी त्रस्त होतो, परंतु शेतकरी त्यांचा धीर आणि धैर्य सोडत नाही, त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी आपण छोटासा हातभार लावायला पाहिजे. हा कोकण आंबा महोत्सव ही एक प्रकारची चळवळ आहे. महोत्सवात दर्जेदार आंबा मिळत असल्याने ठाणेकर या महोत्सवात येतात. यावेळीही ठाणेकरांनी महोत्सवाला भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केळकर यांनी केले.
१ ते १२ मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात, कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच, आंबा-फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे ४५ स्टॉल्स असणार आहेत. या महोत्सवात धान्य आणि कडधान्याचे पाच स्टॉल असणार असून महिला बचत गटांचेदेखील पाच स्टॉल असणार आहेत.
सुरुवातीला पाच कुमारिकांच्या हस्ते आंब्याच्या रोपाचे पूजन करण्यात आले तर मान्यवर पाहुण्यांना प्रथेप्रमाणे फळांची परडी आमदार केळकर यांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून ऋषी देसाई यांनी अस्सल मालवणी भाषेत आंबा महोत्सवाचे गा-हाणे घातले.
महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर,कमल संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, माजी नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, ओमकार चव्हाण, भाजप व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शहा, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, संतोष साळुंखे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, राजेश गाडे, भाजयुमो अध्यक्ष सुरज दळवी, सचिन केदारी आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.