सौजन्य - नवराष्ट्र टीम
सोलापूर : रिक्षा फिटनेससाठी ६०० रुपयांची ही विलंब शुल्क आज हजारो रुपयात जाऊ लागली आहे. यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. ही कारवाई अन्यायकारक असल्याने ती रद्द करण्याची मागणी रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सोलापूरच्या चार हुतात्म्यांना अभिवादन करून रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढला.
या मोर्चाच्या अग्रभागी माजी आमदार नरसय्या आडम, रियाज सय्यद, प्रकाश आळंदकर, अजीज खान, सलीम मुल्ला, प्रदीप शिंगे यांनी नेतृत्व केले. संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रदेश वाहतूक महासंघाचे अध्यक्ष रियाज सय्यद म्हणाले, ‘‘संगणकीय प्रणालीवर दंडाची आकारणी सुरु झाल्यानंतर ही बाब रिक्षा चालकांना २१ मे २०२४ रोजी माहित झाली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी याविषयी बैठक घेऊन शासनास कळविण्याचे आश्वासन देऊन आपले हात झटकले. म्हणून सर्वसमावेशक विचार करून सर्व संमतीने २९ जून रोजीच्या मेळाव्यात निर्णय घेतल्याप्रमाणे आज मोर्चा काढत आहोत. जर मागणी मान्य नाही झाली तर १६ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घालून त्यांच्याकडे याबाबात मागणी करणार आहोत.’’
आळंदकर म्हणाले, शासनाचे वाहतुकीबाबतचे धोरण हे मोठ्या वाहनाच्या व्यवसायावर करत असल्याने तुलनेने व व्यवसायाने छोटे असलेले रिक्षा चालक यामध्ये भरडले जात आहेत. मागील आंदोलनाची आठवण करून देत रिक्षा चालक एकदा जिद्दीला पेटला तर तो आपली मागणी केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. हा इतिहास असून परत एकदा नवीन इतिहास घडविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
…अन्यथा संघर्ष अटळ
आडम म्हणाले की, रिक्षा चालकांची परिस्थिती कथन करत अनेक मोठ्या-मोठ्या उद्योगपतींना करोडो-अरबो रुपयांची कर्ज माफी शासन देत असताना मात्र दिवसाचे १२-१२ तास राबून अहोरात्र प्रवाशी सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांना फिटनेससाठी दररोज ५० रुपये प्रमाणे दंड आकारून आर्थिक पिळवणूक करत आहेत. जोडीला ट्राफिक पोलीस असून रस्त्यावरून वाहन चालविताना त्यांचाही त्रास सहन करावा लागत आहे. पंढरपूरच्या विठोबाने शासनास सुबुद्धी दिलीतर हा अन्यायकारक जुलमी दंड रद्द करतील, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचे मत व्यक्त केले.