दर्यापूर : तालुक्यात तीन दिवसात तिघांची गळफास लावून आत्महत्या (Suicide by hanging) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरूवारी दर्यापूर (Daryapur) येथील सोपान जानराव गुरदे, शुक्रवारी नालवाडा येथील रेणुका नरेंद्र गावंडे आणि शनिवारी दारापूर येथील आणखी एका इसामने आपल्या राहत्या घरात दुपट्याच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. तीन दिवसात लागोपाठ तीन व्यक्तींनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. यामध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.
दारापूर येथील अविनाश रुपरावजी वानखडे (४९) असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अविनाश वानखडे हा व्यक्ती भूमिहीन असून गत एक वर्षापासून मुंबई (Mumbai) येथे खाजगी कंपनीमध्ये काम करत होता. मात्र, गत चार महिन्यांपासून तो गावातच थांबून होता. शनिवार ६ ऑगस्ट रोजी सकाळी राहत्या घराचा दरवाजा आतून बंद असल्याने अविनाश वानखडे यांच्या लहान मुलाने भिंतीवरून घरात प्रवेश केला. दरवाजा उघडला असता, अविनाश वानखडे याने राहत्या घरातच दुपट्टाच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घरच्यांच्या समोर आली.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पीएसआय शेंडे, सुरज यांनी घटनास्थळी धाव घेत घटना स्थळचा पंचनामा केला. अविनाश वानखडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा सामान्य रुग्णालय दर्यापूर (Upazila General Hospital Daryapur) येथे पाठविले. गळफास लावून आत्महत्या करण्यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. अविनाश वानखडे यांच्या पश्चात पत्नी, (१९) वर्षाची मुलगी, (१७) वर्षाचा मुलगा व आई असा परिवार आहे.