डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरक म्हटल्यामुळे खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा (फोटो -टीम नवराष्ट्र)
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊतांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, “भाजप सरकार आल्यापासून या देशाचा नरक झाला असेल तर या देशातील 140 कोटी जनता मोदी यांनी नरकात ढकलले. यावर हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जयशंकर, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त करावे. माय फ्रेंड डोनाल्ड यांनी कटू सत्य मांडलं आहे,” असे प्रत्युत्तर खासदार संजय राऊत यांनी मांडले.
हे देखील वाचा : भक्तीच्या महापुरात न्हाली मोहोळ नगरी; गुरू-शिष्य भेट अन् खर्गे महाराजांकडून ‘ही’ भाकणूक
पुढे ते म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरक म्हटले आहे. त्यामुळे भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी, हा देश नरक नसून नंदनवन आहे हे जाहीर करावं,” असे देखील मत खासदार राऊतांनी व्यक्त केले. दरम्यान, राजकीय पक्षांमधील नेत्यांची विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : ‘कभी इंडिया आके देखो…’ भारताला नरक’ बोलणाऱ्या ट्रम्पना इराणने दाखवली जागा; केले ‘असे’ धडाकेबाज Tweet
त्याचबरोबर संजय राऊत म्हणाले की, “विधान परिषदेसाठी पाठिंबा हा शब्द चुकीचा आहे. विधानपरिषदेसाठी मी उमेदवार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं नाही, त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. काल काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आले होते. सविस्तर चर्चा केली. फक्त विधान परिषद या एका विषयावर चर्चा केली नाही. भविष्यातील अनेक घडामोडी, महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणं, येणाऱ्या लोकसभा आणि संघटनात्मक कामावर चर्चा झाली,” अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.






