माजी गृहमंत्री देशमुख यांनी शक्यता फेटाळली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाची शक्यता फेटाळली. दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता कमी आहे, असे ते म्हणाले.
अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हापासून या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी ‘सिल्व्हर ओक’ला भेट दिल्यानंतर दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा अलीकडे पुन्हा सुरू झाली आहे. या भेटी केवळ राजकीय सौजन्याचा भाग म्हणून पाहिल्या पाहिजे. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. विविध पक्षांचे नेते सदिच्छा म्हणून त्यांना वारंवार भेटत असतात. या भेटींवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पुन्हा एकत्र येत असल्याचा निष्कर्ष काढणे गैर आहे. दोन्ही गट एकत्र येणार नाही, या केवळ अफवांना कोणताही राजकीय आधार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात अंमली पदार्थांच्या सेवनामुळे तरुणांच्या मृत्यूची वाढती संख्या अत्यंत चिंताजनक आहे. त्यांनी मुंबईतील नेस्को (गोरेगाव) येथे झालेल्या संगीत कार्यक्रमात दोन तरुणांचा मृत्यू, वरळीतील डोम येथे एका तरुणाचा मृत्यू आणि पुण्यातील एका फार्महाऊसशी संबंधित घटनेचा उल्लेख करून सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. सरकार केवळ ‘नो टॉलरन्स’ धोरण जाहीर करून थांबू शकत नाही. ही मोहीम अधिक प्रभावीपणे आणि व्यापकपणे राबवण्याची गरज आहे.
खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी संकटात
ते म्हणाले, खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली आहे. परंतु शेतकऱ्यांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बाजारात युरिया, डीएपी आणि मिश्र खतांचा तीव्र तुटवडा आहे. गेल्या दीड महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आणि पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यांनी आरोप केला की, महागाईवर सरकारचे कोणतेही प्रभावी नियंत्रण नाही, ज्यामुळे सामान्य नागरिक आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत.






