महापालिकेचा भोंगळ कारभार! संभाजीनगरमधील ८० धोकादायक इमारतींवर कारवाई कागदावरच (Photo Credit- X)
महापालिकेच्या सर्वेक्षणात शहरातील अनेक इमारती धोकादायक म्हणून नोंदविण्यात आल्या आहेत. विशेषतः जुन्या शहरातील दाट लोकवस्तीच्या आणि व्यापारी भागांमध्ये अशा इमारतींची संख्या अधिक आहे. या भागातून दररोज हजारो नागरिकांची ये-जा होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मान्सूनपूर्व काळात धोकादायक इमारती रिकाम्या करून त्यांच्यावर पाडकामाची कारवाई अपेक्षित होती. मात्र, प्रशासनाने नोटिसा बजावण्यापलीकडे कोणतीही प्रभावी पावले उचललेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात इमारत कोसळल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
महापालिकेने धोकादायक इमारतींवरील कारवाईची जबाबदारी संबंधित झोन कार्यालयांवर सोपविली असली, तरी कोणत्याही झोनकडून अद्याप प्रत्यक्ष पाडकाम सुरू झालेले नाही. परिणामी, धोकादायक इमारती हटविण्याची मोहीम केवळ आदेश आणि नोटिसांपुरतीच मर्यादित राहिल्याची टीका होत आहे.
महापालिकेच्या यादीतील बहुतांश धोकादायक इमारती जुन्या शहरातील व्यापारी व दाट लोकवस्तीच्या भागात आहेत. सराफा बाजार, मुलूमची बाजार, शहागंज, चौराहा, टिळकपथ, गुलमंडी, नाझ गल्ली, नगरखाना गल्ली, केळीबाजार, खाराकुंवा, दलालवाडी, भांडीबाजार, सुपारी हनुमान रोड तसेच बारूदगर नाला परिसरात अशा इमारतींचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात दिवसभर मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि व्यापाऱ्यांची वर्दळ असल्याने धोका अधिक गंभीर मानला जात आहे.
धोकादायक इमारतींवर कारवाईची जबाबदारी संबंधित झोन कार्यालयांना देण्यात आली आहे. सर्व झोन अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही ठिकाणी पाडकाम सुरू झाल्याचे दिसत नाहीत.






