नवनीत राणांना मिळणार राज्यसभेची उमेदवारी? सुनील तटकरेंच मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अश्यातच काल (शनिवार, ६ जून) नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राज्यसभेवर नवनीत राणा यांची वर्णी लागणार का याबाबत चर्चाना उधाण आले. मात्र आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत मोठे भाष्य करत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. “नवनीत राणा हा विषय राष्ट्रवादीसाठी संपलेला आहे,” असे म्हणत त्यांनी या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर छगन भुजबळ यांना राज्यसभा सदस्यत्व मिळणार, अश्या चर्चा होत्या. मात्र नवनीत राणा यांनी काल अचानक मुंबईत येऊन देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्यसभेच्या शर्यतीत नवनीत राणा देखील असल्याचे स्पष्ट झाले. नवनीत राणांसाठी राष्ट्रवादी हि जागा सोडेल यासाठी भाजपचे प्रयत्न असल्याचे बोलले जात होते. आता मात्र सुनील तटकरे यांनी या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या असून छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
छगन भुजबळ यांनी शनिवारी (६ जून) पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी करत ‘मी राज्यसभेवर गेल्यानंतर माझ्या जागी पुतण्या समीर भुजबळ याना मंत्रिमंडळात घ्यावे,’ अशी मागणी केली. भुजबळांसह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही फडणवीसांकडे तसा आग्रह केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. मात्र अजूनदेखील भाजपकडून याबाबत होकार मिळाला नसल्याचे समजत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयाची वाट बघत बसले आहेत. भाजप हायकमांडकडून भुजबळांच्या मागणीला ग्रीन सिग्नल मिळाल्यास भुजबळ सोमवारी आपला राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल करतील, अशीही माहिती मिळत आहे.
आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शनिवारी संध्याकाळपर्यंत छगन भुजबळ यांच्या नावाची अधिकृत घोषणा करतो की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय लक्ष लागले आहे. याशिवाय, महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्व छगन भुजबळ यांच्या आग्रहापुढे झुकून समीर भुजबळ यांचा राज्याच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करून त्यांना मंत्री म्हणून शपथ देतील की नाही, हे पाहणे अत्यंत रंजक आणि आव्हानात्मक असेल. जर हे सूत्र पूर्णपणे यशस्वी झाले, तर आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी ओबीसी राजकीय पटलावर महायुतीला मोठे बळ मिळू शकते.
Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीत आघाडीत दिसून आली बिघाडी; पण युती मात्र सुसाट…






