महायुतीत वादाची पुन्हा ठिणगी; शिवसेना आणि राष्ट्रवादी 'या' मुद्यावरून आमनेसामने
मुंबई : कोकणातील महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक संघर्षात आता मंत्री योगेश कदम यांनी उडी घेत ‘आता नो कॉम्प्रोमाईज’ असा स्पष्ट इशारा दिला आहे.
सुनील तटकरे यांच्या वक्तव्यानंतर तडजोडीची कोणतीही शक्यता उरलेली नसल्याचे सांगत योगेश कदम म्हणाले, आता हा वाद मिटेल असे मला वाटत नाही. मीही त्यांच्याबद्दल तिखट बोलू शकतो, पण खोलात पडायचे नाही. तसेच, मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोणी कोणाला मदत केली, हे बाहेर आले तर अनेकांचे पितळ उघडे पडेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. यापूर्वी रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका करत तटकरे जिथे जेवतील तिथेच छेद करतील, असे वक्तव्य केले होते.
त्याला प्रत्युत्तर देताना तटकरेंनीही कदम यांच्यावर वैयक्तिक टीका करत त्यांची मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित करणारी टिप्पणी केली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांतील वाद अधिकच चिघळला. योगेश कदम यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा संघर्ष आता केवळ वैयक्तिक न राहता महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आल्याचे चित्र आहे.
विरोधात शड्डू ठोकणाऱ्यांना भाजपमध्ये घेऊ नये
यापूर्वी महायुतीच्या विरोधात लढले, त्यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत विचार केला पाहिजे, अशा शब्दांत महायुती सरकारमधील शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चेच्या संदर्भाने पाटील यांनी या कानपिचक्या दिल्या आहेत. एवढेच नाही तर आमच्याकडेही पक्षप्रवेशासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला मंत्रिपद
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या ६ खासदारांच्या पक्षांतराला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याने संसदेत शिवसेनाच खरी मजबूत असल्याचे सिद्ध झाले आहे. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पक्षाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, असा दावाही पाटील यांनी केला आहे.
सरकार बदलत नाही; उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरे यांच्या सरकार बदलण्याच्या विधानावर पाटील म्हणाले, केवळ आंदोलन किंवा घोषणाबाजीमुळे सरकार बदलत नाही. जनतेचा विकास करणारे सरकारच टिकते. सध्या राज्य आणि देशात विकासाची कामे सुरू आहेत. दरम्यान, राजीनामा मागताना कोणाचा राजीनामा मागत आहोत, याचे भान ठेवले पाहिजे. राजीनामा देणे किंवा घेणे हा सरकारचा निर्णय असतो, अशा शब्दांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या मागणीवर प्रत्युत्तर दिले.






