पहिल्या गटाच्या गुणतालिकेत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका सध्या प्रत्येकी २ गुणांसह अव्वल स्थानांवर आहेत. तर भारत आणि झिम्बाब्वे हे संघ शेवटच्या दोन स्थानांवर आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांसाठी सेमीफायनलमध्ये जाण्याचा रस्ता बराच कठीण आहे.
सेमीफायनलसाठी थेट पात्र प्रवेश मिळवण्यासाठी भारताला त्यांचे शेवटचे दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरोधातील सामना जिंकणे भारतासाठी महत्त्वाचा आहे. भारताने त्यांचे दोन्ही अंतिम सामने जिंकले आणि वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर तीन संघांचे प्रत्येकी चार गुण होतील. त्यामुळे कोण सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार हा निर्णय रनरेटवरुन ठरेल. भारताला इतर संघांपेक्षा चांगला रनरेट राखावा लागेल म्हणजे भारताला मोठा अंकांनी सामना जिंकणं गरजेचं आहे.जर भारताने एकही सामना गमावला तर भारतीय संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होईल.
दक्षिण आफ्रिका आता वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेला हरवून उपांत्य फेरीत पोहोचली आहे. पण त्यांनी पुढील सामना गमावला तरीही त्यांना त्यांचं रनरेट कायम ठेवावं लागेल. पात्र ठरण्यासाठी वेस्ट इंडिजला दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. एकही सामना गमावला तर त्यांचाही खेळ रनरेटवर येउन अडकेल. दोन्ही सामने गमावल्यास ते स्पर्धेतून बाहेर होतील. झिम्बाब्वेने पहिला सामना गमावला आहे. आता त्यांना सेमीफायनलमध्ये पात्रता मिळवण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे दोन्ही अंतिम सामने जिंकावे लागतील. एकही सामना गमावल्यास त्यांना स्पर्धेबाहेर पडावे लागेल.
गट २ मध्ये इंग्लंडने चार गुणांसह उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केले आहे. इंग्लंडने शेवटच्या सामन्यात जर न्यूझीलंडला पराभूत केलं तर त्यांच्या गटात पहिले स्थान निश्चित करतील. आज न्यूझीलंडचा सामना श्रीलंकेशी होईल. या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळाल्यास श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात येईल आणि त्यानंतर होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला तरीही हा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरु शकत नाही. पात्रता मिळविण्यासाठी न्यूझीलंडला इंग्लंड आणि श्रीलंका संघाला पराभूत करावं लागेल.
आज न्यूझीलंड आणि श्रीलंका संघाचा सामना आहे. त्यात श्रीलंकेचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. श्रीलंकेने विजय मिळवल्यास संघ सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या शक्यता वाढतील. त्यात शेवटच्या सामन्यात पाकिस्तानविरोधात विजय मिळवल्यास ते उपांत्य फेरीत पोहोचतील.






