BabElMandeb: 'अश्रूंचे द्वार' जागतिक अर्थव्यवस्थेला रडवणार? 'बाब अल-मंदेब' नाकेबंदीच्या इशाऱ्याने कच्च्या तेलाच्या बाजारात भूकंप ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Bab el-Mandeb Strait trade disruption 2026 : जागतिक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी वर्तुळातून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे. मध्य पूर्वेतील (Middle East) अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या लष्करी तणावाचे सावट आता जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांवर पडले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) वाहतूक आधीच प्रभावित झाली असताना, आता इराणच्या इशाऱ्यानंतर येमेनच्या हुथी बंडखोरांनी ‘बाब अल-मंदेब’ (Bab el-Mandeb Strait) हा सागरी मार्ग पूर्णपणे बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. इराणच्या ऊर्जा आणि वीज पायाभूत सुविधांवर अमेरिकेने हल्ले केल्यास, हुथी बंडखोर या रणनीतिक मार्गाची संपूर्ण नाकेबंदी करतील, असा इशारा देण्यात आला आहे. हा मार्ग बंद झाल्यास केवळ जागतिक अर्थव्यवस्थाच कोलमडणार नाही, तर भारताच्या ऊर्जा सुरक्षेला आणि अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो.
भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास, बाब अल-मंदेब ही सामुद्रधुनी तांबड्या समुद्राला (Red Sea) एडनच्या आखाताशी आणि अरबी समुद्राशी जोडणारा एक अत्यंत अरुंद आणि महत्त्वाचा जलमार्ग आहे. आशिया, युरोप आणि आफ्रिका या तीन खंडांना जोडणारे हे सर्वात मोठे प्रवेशद्वार मानले जाते. अरेबिक भाषेत ‘बाब अल-मंदेब’चा अर्थ “दुःखाचे किंवा अश्रूंचे द्वार” (Gate of Tears) असा होतो. ऐतिहासिक काळापासून हा मार्ग सागरी प्रवासासाठी अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक मानला गेला आहे आणि आज आधुनिक काळातही हा मार्ग युद्धाच्या छायेत आल्याने जागतिक अर्थव्यवस्थेसाठी खरोखरच ‘अश्रूंचे द्वार’ ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gilgit Baltistan: पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा डोळा; गिलगिट बाल्टिस्तानला 5 वा प्रांत घोषित करण्यासाठी विधानसभेत ठराव मंजूर
आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या (IMO) आकडेवारीनुसार, या अत्यंत अरुंद जलमार्गावरून दररोज अंदाजे ९ ते १० अब्ज डॉलर्सचा (सुमारे ८०,००० कोटी रुपये) जागतिक व्यापार चालतो. एवढेच नाही तर दररोज या मार्गावरून साधारणपणे ४० ते ७४ लाख बॅरल कच्चे तेल (Crude Oil) आणि पेट्रोलियम उत्पादनांची जहाजे ये-जा करतात. जागतिक स्तरावर होणाऱ्या एकूण सागरी व्यापारापैकी १०% ते १२% व्यापार आणि एकूण जागतिक कंटेनर वाहतुकीचा ३०% हिस्सा एकट्या बाब अल-मंदेब मार्गावरून हाताळला जातो. त्यामुळे या मार्गाला जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. जर हा मार्ग बंद झाला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० ते १५० डॉलर्सच्या पार जाऊ शकतात, ज्यामुळे जगभरात महागाईचा प्रचंड भडका उडू शकतो.
भारताच्या दृष्टीने बाब अल-मंदेब हा मार्ग अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा आहे, कारण भारताची ऊर्जा सुरक्षा आणि औद्योगिक क्षेत्र या मार्गावरून होणाऱ्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.
१. रशियन कच्चे तेल आणि एलएनजी (LNG): भारत सध्या मोठ्या प्रमाणावर रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल आयात करतो. हे रशियन कच्चे तेल तांबडा समुद्र आणि बाब अल-मंदेब मार्गावरूनच भारतीय बंदरांवर पोहोचते. याशिवाय, युरोप आणि उत्तर आफ्रिकेच्या देशांमधून भारतात येणारा द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG) देखील याच कॉरिडॉलचा वापर करतो.
२. शेतीसाठी आवश्यक खते: भारताचे कृषी क्षेत्र मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असणारी पोटॅश (Potash) आणि फॉस्फेट (Phosphate) यांसारखी रासायनिक खते आणि कच्चा माल याच मार्गाने युरोप आणि आफ्रिकेतून भारतात येतो. हा पुरवठा खंडित झाल्यास भारतातील खतांचा तुटवडा निर्माण होऊन शेती उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
३. औद्योगिक रसायने आणि औषध निर्मितीचा कच्चा माल (API): भारतातील प्रसिद्ध औषधनिर्माण (Pharmaceutical) उद्योगाला लागणारी महत्त्वाची औद्योगिक रसायने आणि ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स (API) युरोपियन देशांमधून याच सागरी मार्गाने भारतात येतात.
४. अवजड यंत्रसामग्री आणि इलेक्ट्रॉनिक्स: भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी लागणारी महागडी अभियांत्रिकी उपकरणे, कारखान्यांमधील अवजड यंत्रसामग्री आणि महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक घटक युरोपमधून याच व्यापारी मार्गाद्वारे आयात केले जातात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Elections 2026: निवडणुकीवरून अमेरिकेत राजकीय युद्ध; ट्रम्प यांना उद्देशून कमला हॅरिस म्हटल्या, ‘स्वतःचे अपयश लपवण्यासाठी…’
जर चालू संघर्षामुळे किंवा हुथी बंडखोरांच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे बाब अल-मंदेब पूर्णपणे बंद झाला, तर जागतिक नौवहन कंपन्यांना (Shipping Companies) तांबड्या समुद्राचा मार्ग सोडून द्यावा लागेल. अशा परिस्थितीत, जहाजांना संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून दक्षिण आफ्रिकेच्या ‘केप ऑफ गुड होप’ (Cape of Good Hope) मार्गे प्रवास करावा लागेल.
या पर्यायी आणि प्रदीर्घ मार्गामुळे जहाजांचा प्रवास अंतरानुसार १० ते १४ दिवसांनी वाढेल. प्रवासाचे दिवस वाढल्यामुळे जहाजांचे इंधन प्रचंड प्रमाणात खर्च होईल, कर्मचारी खर्च वाढेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सागरी विम्याचा दर (Insurance Premiums) गगनाला भिडेल. याचा थेट परिणाम म्हणजे पुरवठा साखळी (Supply Chain) विस्कळीत होईल आणि भारतात आयात होणाऱ्या प्रत्येक वस्तूची किंमत वाढेल, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल, डिझेलसह सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू महाग होऊ शकतात.






