Trump Tariff : भारत अमेरिका व्यापारयुद्धावर संपूर्ण जगाची नजर; जाणून घ्या जागतिक माध्यमांनी काय लिहिले? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Media Reaction On Trump Tariff:अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारतावर तब्बल ५०% कर (टॅरिफ) लावण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय केवळ दोन्ही देशांच्या व्यापारी नात्यालाच धक्का देत नाही, तर जागतिक पातळीवर मोठ्या चर्चेला कारणीभूत ठरत आहे. ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवले नाही, म्हणून हा कठोर निर्णय घेण्यात आला. परंतु यामुळे अमेरिका-भारत व्यापार संबंधांत अभूतपूर्व तणाव निर्माण झाला आहे.
अमेरिकन चॅनेल सीएनएनने या कराला ‘मोठा धक्का’ असे संबोधले आहे. त्यांच्या मते, ट्रम्प यांनी भारतासारखा मोठा भागीदार गमावण्याचा धोका पत्करला आहे. सीएनएनने म्हटले आहे की, “रशियन तेलावरून लादलेली करवाढ मोदी सरकार सहज स्वीकारणार नाही. ट्रम्पच्या पहिल्या कार्यकाळात जे संबंध गोड होते, ते आता बिघडले आहेत.” याशिवाय, सीएनएनच्या दुसऱ्या अहवालात नमूद आहे की या करवाढीमुळे अमेरिकेत भारतीय वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. आधीच महागाई आणि बेरोजगारीचा दबाव असताना ग्राहक व कंपन्यांवर त्याचा अतिरिक्त परिणाम होत आहे. भारताने जाहीरपणे सांगितले आहे की तो या निर्णयाला प्रत्युत्तर देईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US 50Percent Tariff : अमेरिकेचा भारतावर कर प्रहार; 50% टॅरिफमुळे ‘या’ क्षेत्रांना होणार आता गंभीर नुकसान
गार्डियनने भारत-अमेरिका संबंधांवर हे आतापर्यंतचे “सर्वात मोठे नुकसान” असल्याचे म्हटले आहे. एका भारतीय व्यापार अधिकाऱ्याचे उद्गार त्यांच्या वृत्तात छापले गेले आहेत “ट्रम्प यांनी अध्यक्षपदाव्यतिरिक्त सर्वस्व गमावले आहे.” गार्डियनच्या विश्लेषणानुसार, भारतातील वातावरण सध्या ‘बंडखोर’ झाले आहे. मोदी सरकार रशियन तेल खरेदी थांबवण्यास नकार देत असून, ‘मेड इन इंडिया’वर अधिक भर देत आहे. मोदींचे ठाम विधान होते “दबाव येईल, परंतु आम्ही लढू.” अर्थतज्ज्ञ शंतनू सेनगुप्ता (गोल्डमन सॅक्स) यांनी इशारा दिला आहे की हा कर सुरू राहिला, तर भारताचा जीडीपी विकासदर ६.५% वरून ६% च्या खाली घसरू शकतो.
गार्डियनचे राजनैतिक संपादक पॅट्रिक विंटूर यांनी असेही लिहिले आहे की ट्रम्प टॅरिफद्वारे आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ब्रिक्स देश (ब्राझील, रशिया, भारत, चीन) यांनी एकत्रित निषेध नोंदवल्याने अमेरिकेविरोधात नवीन प्रतिकार अक्ष तयार होऊ शकते.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टॅरिफ लागू होताच जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमध्ये तणाव वाढला आहे. भारतातील लहान निर्यातदार आणि रोजगार धोक्यात आले आहेत. त्यांच्या अहवालात नमूद आहे की अमेरिका-भारत यांच्यातील पाच फेऱ्यांच्या चर्चेचे अपयश झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. भारताची मागणी होती की अमेरिका इतर देशांप्रमाणे (जपान, कोरिया, ईयू) जास्तीत जास्त १५% कर लावावा. परंतु गैरसमज आणि संकेतांकडे दुर्लक्ष झाल्याने करार झाला नाही. २०२४ मध्ये भारत-अमेरिका व्यापार १२९ अब्ज डॉलर्सचा होता, ज्यामध्ये अमेरिकेची तूट तब्बल ४५.८ अब्ज डॉलर्स होती.
ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे की भारतावरील ५०% कर हा अमेरिकेतील “सर्वात जड” करवाढींपैकी एक आहे. रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास मोदी सरकारने नकार दिल्यामुळे ट्रम्प संतप्त झाले आणि हा निर्णय घेतला. वृत्तपत्राने असा दावाही केला की ट्रम्प यांनी मोदींशी अनेक वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, पण मोदींनी कॉल नाकारला.
कतारची सरकारी वाहिनी अल जझीराने म्हटले आहे की या जड करांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आघात होईल. २०२४ मध्ये भारताने ८७ अब्ज डॉलर्सहून अधिक निर्यात अमेरिकेला केली होती. मोदी सरकारचा हवाला देत अल जझीराने लिहिले की हा कर ‘अन्याय्य आणि अवास्तव’ आहे आणि यामुळे भारताच्या ४८ अब्ज डॉलर्सहून अधिक निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. तर एपी (असोसिएटेड प्रेस) ने स्पष्ट केले की या निर्णयामुळे लाखो नोकऱ्यांवर धोका निर्माण होतो आणि जगातील पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची भीती आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indians in Global Politics: जागतिक शक्तीचा ठसा! कोण म्हणतं भारत मर्यादित आहे? 29 देशांमध्ये चमकले ‘हे’ 261 भारतीय चेहरे
ट्रम्प यांचा हा निर्णय केवळ आर्थिक नाही, तर राजकीय आणि धोरणात्मक परिणाम घडवून आणणारा आहे. एका बाजूला अमेरिका आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे भारत स्वतःची स्वायत्त भूमिका टिकवून आहे. जागतिक माध्यमांचा सूर मात्र एकाच दिशेने आहे हा कर दोन्ही देशांच्या संबंधांना मोठा धक्का देतो आणि जगाच्या अर्थकारणात नवीन अनिश्चितता निर्माण करतो.