(फोटो- सोशल मिडिया)
मध्यपूर्वेतील संघर्ष संपण्याच नाव घेत नाही आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून येत आहे. सगळ्याच गोष्टींचा तुटवडा भासत असल्याने परिणाम दरवाढ होत आहे. त्यामुळे महागाईचा भडका चांगलाच उडाला आहे. या सगळ्याचा परिणाम वायु वाहतुकीवरही होताना दिसत आहे. देशातील दोन सर्वात मोठ्या विमान कंपन्या इंडिगो आणि एअर इंडिया जून महिन्यापासून दररोजच्या सुमारे २५० देशांतर्गत विमानांच्या फेऱ्या रद्द करण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयामागील मुख्य कारणे म्हणजे ‘एव्हिएशन टर्बाइन फ्युएल’ म्हणजेच ATFच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि हवाई प्रवासाच्या मागणीत झालेली घट. या परिस्थितीमुळे विमान कंपन्यांच्या कामकाजावर मोठा ताण येत आहे.
विमानांच्या फेऱ्यांमधील ही कपात जून ते ऑगस्ट या कालावधीत म्हणजेच संपूर्ण उन्हाळी हंगामात सुरू राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे, शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर जून ते ऑगस्ट या महिन्यांदरम्यान हवाई प्रवासाची मागणी कमी होत असते. इंधनावरील वाढता खर्च आणि प्रवासाच्या मागणीतील घट यांचा समतोल राखण्यासाठी विमान कंपन्या हे पाऊल उचलत आहेत. परिणामी, या कालावधीत तुमची विमानफेरी रद्द झाल्यास, तुम्हाला विनामूल्य प्रवासाची तारीख बदलून घेणे, पर्यायी मार्गाचा वापर करणे किंवा तिकिटाचे संपूर्ण पैसे परत मिळवणेयांसारखे पर्याय उपलब्ध करून दिले जातील.
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तसेच मध्यपूर्वेतील सततच्या तणावामुळे, ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी, भारतातील अनेक शहरांमध्ये जेट इंधनाची किंमत ८०,००० रुपये प्रति किलोलिटरवरून वाढून १,००,००० रुपये प्रति किलोलिटरचा टप्पा ओलांडून गेली आहे. यामुळे, देशांतर्गत विमानसेवांसाठी इंधनाचा खर्च सुमारे २५ टक्क्यांनी, तर आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी तो जवळपास १०० टक्क्यांनी वाढला आहे.
‘एअर इंडिया’ जून आणि जुलै या महिन्यांमध्ये आपल्या देशांतर्गत विमानसेवांमध्ये सुमारे २२ टक्क्यांची कपात करत आहे. ही विमान कंपनी सध्या दररोज सुमारे ५०० देशांतर्गत उड्डाणे चालवते; या कपातीचा अर्थ असा की, दररोजच्या उड्डाणांमध्ये साधारणपणे ११० ने घट होईल, ज्यामुळे साप्ताहिक स्तरावर सुमारे ८०० उड्डाणे कमी होतील.
त्याचप्रमाणे, ‘इंडिगो’ ही विमान कंपनी देखील आपली देशांतर्गत उड्डाणे ५ ते ७ टक्क्यांनी, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणे १७ टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही कंपन्यांच्या उपाययोजनांचा एकत्रित परिणाम म्हणून, जून ते ऑगस्ट या कालावधीत दररोज सुमारे २५० उड्डाणे रद्द राहतील.






