फोटो सौजन्य : सोशल मीडिया
Sajjan Jindal Statement : पश्चिम आशियातील सध्याचा तणाव आणि इराणचा समावेश असलेल्या संघर्षमय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, JSW समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी भारताची अर्थव्यवस्था आणि औद्योगिक क्षेत्राबाबत ठाम विश्वास व्यक्त केला आहे. सध्याच्या भू-राजकीय संकटाचा भारतावरील परिणाम दीर्घकाळ टिकणार नाही आणि देशाच्या विकासाचा आलेख भक्कमच राहील, असा दावा त्यांनी केला आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सज्जन जिंदाल यांनी सांगितले की, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील सध्याच्या संघर्षाचे परिणाम जास्तीत जास्त दोन महिने टिकण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, उद्योग क्षेत्र या संपूर्ण संकटाकडे केवळ एक तात्पुरती परिस्थिती म्हणूनच पाहत आहे. पण नेमका २ महिन्याचा आकडा का सांगितला गेला?
सज्जन जिंदाल यांनी नमूद केले की, प्रमुख उद्योग आणि व्यावसायिक समूह आपल्या गुंतवणुकीच्या आणि प्रकल्पांच्या योजना दीर्घकालीन दृष्टीकोनातून आखतात. ज्यांचा कालावधी २०, २५ किंवा अगदी ५० वर्षांपर्यंतचा असतो. परिणामी, काही महिन्यांचा भू-राजकीय तणाव त्यांच्या दीर्घकालीन धोरणांवर कोणताही परिणाम करु शकत नाही. या संघर्षाचा औद्योगिक हालचालींवर आणि बाजारातील वातावरणावर थोडासा मंदावणारा परिणाम झाला आहे, हे त्यांनी मान्य केले; परंतु घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. भारताचा मूलभूत आर्थिक पाया आजही भक्कम असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
JSW समूहाच्या अध्यक्षांच्या मते, आर्थिक वर्ष २०२६-२७ दरम्यान देशातील कॉर्पोरेट भांडवली खर्चाचा वेग आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. यामागील मुख्य कारणे म्हणजे कंपन्यांच्या भक्कम बॅलन्स शीट्स आणि त्यांच्यावरील कर्जाचे कमी प्रमाण ही आहेत. त्यांनी नमूद केले की, भारतातील बहुतांश प्रमुख कंपन्या आता नवीन गुंतवणूक आणि विस्तारासाठी सज्ज झाल्या आहेत. नेमक्या याच कारणामुळे सध्या उत्पादन, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होताना दिसून येत आहे.
सज्जन जिंदाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया‘ मोहिमेचेही कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, देशांतर्गत उत्पादन क्षेत्राच्या वाढीमुळे परकीय चलनात मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. विशेषतः EV क्षेत्राचा संदर्भ देत त्यांनी म्हटले की, जर भारताला तेलाच्या आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करायचे असेल, तर इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी यांचे उत्पादन अत्यंत महत्त्वाचे ठरेल. JSW समूह सध्या नागपूरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी आणि सेल्सच्या उत्पादनावर काम करत आहे. त्यांचा असा दावा आहे की, या उपक्रमामुळे भविष्यात भारताला मोठे आर्थिक लाभ मिळतील आणि तेलाच्या आयातीचा बोजा कमी होईल.






