(फोटो सौजन्य:Chatgpt)
Telegram Ban Impact: भारतातील टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी २२ जूनपर्यंत लागू राहील. कंपनीच्या याचिकेवर सुनावणी करताना, दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारचा आदेश मनमानी किंवा अवाजवी मानण्यास नकार दिला. भारतात बंदीचा सामना करणाऱ्या टेलिग्राम या मेसेजिंग प्लॅटफॉर्मला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. याचा नेमका टेलिग्रामवर कसा आणि किती परिणाम होणार आहे? सविस्तर जाणून घेऊयात.
टेलिग्रामची याचिका फेटाळताना, दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय मनमानी म्हणता येणार नाही. उच्च न्यायालयाचा हा निर्णय टेलिग्रामसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सरकारने २२ जूनपर्यंत टेलिग्राम बंद करण्याचे आणि ३० जूनपर्यंत त्याचे मेसेज-एडिटिंग फीचर निष्क्रिय करण्याचे आदेश दिले होते. NEET-UG २०२६ परीक्षेतील कॉपी आणि पेपरफुटीच्या रॅकेटला आळा घालण्यासाठी हे करण्यात आले होते, ज्याला कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते.
भारतात टेलिग्रामचे १०४ दशलक्ष ते १५० दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत, ज्यामुळे भारत ही जागतिक स्तरावर त्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे, जर ही बंदी केवळ २२ जूनपर्यंतच लागू असेल, तर कंपनीच्या महसुलावर तात्काळ थेट परिणाम होणार नाही. पण या कालावधीत भारतातील ॲप-मधील जाहिरातींमधून मिळणारा महसूल पूर्णपणे बंद होईल. भारतात टेलिग्रामचे लाखो सशुल्क वापरकर्ते आहेत. ॲपवरील बंदीमुळे नवीन सदस्यत्व घेणे थांबले आहे, ज्यामुळे कंपनीच्या रोख प्रवाहावर परिणाम झाला आहे.
India’s IT ministry banned Telegram for one week because some users shared leaked exam questions. This punishes 150M+ ordinary Telegram users in India — not the insiders who leaked the exam materials. And the ban hasn’t stopped anything. The leaks just moved to other apps. https://t.co/CzQWN4mXfb — Pavel Durov (@durov) June 16, 2026
टेलिग्राम आधीच तोट्यात चालणारी कंपनी आहे. २०२५ च्या सुरुवातीला ८७० दशलक्ष डॉलर्सच्या अंदाजित महसुलाच्या तुलनेत, कंपनीला २२० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त तोटा झाला आहे. आता, भारतातील बंदीमुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये कंपनीची विश्वासार्हता कमी होईल. भविष्यात निधी मिळवण्यात कंपनीला अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे तिच्या बाजार मूल्यांकनावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
कंपनीचे सीईओ, पावेल डुरोव्ह, टेलिग्राम बंदीबद्दल म्हणाले, “या बंदीचे परिणाम भारतातील टेलिग्रामच्या १५ कोटी वापरकर्त्यांना भोगावे लागतील, कागदपत्रे लीक करणाऱ्या कंपनीतील लोकांना नाही. माहिती बाहेर येणे थांबणार नाही; ही बंदी फक्त घोटाळेबाजांना इतर ॲप्सकडे वळण्यास भाग पाडेल.”






