फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Nisarga Adhikary IIT Kanpur: सध्या कोणतीही नोकरी मिळवण्यासाठी आधी रिझयुमे पाठवावा लागतो आणि त्यानंतर मुलाखत होऊन निवड केली जाते. परंतु, १९ वर्षांच्या निसर्ग अधिकारी या तरुणाला केवळ एका ब्लॉकमुळे आयआयटी (IIT) कानपुरच्या ‘टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब’ (C3iHub) मध्ये ‘ओपन-सोर्स इंटेलिजन्स’ (OSINT) आणि ‘थ्रेट इंटेलिजन्स इंजिनिअर’ (Threat Intelligence Engineer) म्हणून थेट नियुक्ती देण्यात आली आहे.
निसर्गने एक ब्लॉग पोस्ट लिहीली होती, ज्यामध्ये त्याने सीबीएसईच्या ‘ऑन स्क्रिन मार्किंग’ पोर्टलमधील सुरक्षेशी संबंधित काही गंभीर त्रुटी समोर आणल्या होत्या. हा ब्लॉग आयआयटी कानपूरचे संचालक प्रा. मनिंद्र अग्रवाल यांच्या वाचनात आला आणि त्यांनी थेट निसर्गशी संपर्क साधला. संचालकांनी सांगितले की, निसर्गला सायबर सुरक्षा टीममध्ये इंजिनिअर म्हणून सामावून घेण्यात आले आहे. आयआयटी कानपूरमध्ये ही भरतीची पहिली वेळ नसून यापूर्वीही काही तरुण अभियंत्यांची अशाच पद्धतीने नियुक्ती केली आहे.
निसर्गने सीबीएसईच्या ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ (OSM) प्रणालीच्या सुरक्षेच्या त्रुटी उघड केल्या आहेत. ज्यानंतर डिजिटल मूल्यांकन प्रणालीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. अहवालानुसार, ही प्रक्रिया अत्यंत घाईघाईने लागू करण्यात आली होती. पहिलया टेंडरमध्ये एकही कंपनी पात्र ठरली नसून नंतर हे काम ‘Coempt Edu Teck’ या कंपनीला मिळाले. तपासणीत असेही आढळून आले की, या कंपनीचे सायबर सुरक्षा प्रमाणपत्र दुसऱ्या एका क्लायंटच्या जुन्या आणि टेस्टिंग सिस्टिमशी संबंधित होते.
आयआयटी कानपूरमध्ये आता निसर्ग इंटरनेटवर उपलब्ध माहितीचे(OSINT) विश्लेषण करेल आणि वेगवेगळ्या वेबसाईट्स व ॲप्समधील सुरक्षा त्रुटी शोधून त्या दुरुस्त करण्यास मदत करेल. त्याला कंत्राटी तत्वावर (Contract Basis) सायबर सुरक्षा टीममध्ये घेण्यात आले आहे. निसर्गने सांगितले की, शैक्षणिक संस्थेत काम करण्याचा त्याचा हा पहिलाच अनुभव असेल. यापूर्वी त्याने काही स्टार्टअप्ससोबत काम केले आहे. तसेच लहानपणापासूनच कोडिंगची आवड असणारा निसर्ग इयत्ता सहावीपासूनच सायबर सुरक्षा सीटीएफ (CTF) स्पर्धामध्ये भाग घेत असे.






