फोटो सौजन्य- सोशल मीडिया
KVS Language Policy 2026: देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये (Kendriya Vidyalaya) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाषा शिक्षणाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) ने शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून इयत्ता ६ वी आणि इयत्ता ९ वी मध्ये संस्कृत विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत किमान एक स्वतंत्र सेक्शन (Section) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
या नवीन व्यवस्थेअंतर्गत विद्यार्थ्यांना ‘तिसरी भाषा’ निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. विद्यार्थी संस्कृत किंवा कोणत्याही निर्धारित प्रादेशिक (क्षेत्रीय) भाषेची निवड करू शकतील. मात्र, ही भाषा त्यांची पहिली भाषा ‘हिंदी’ आणि दुसरी भाषा ‘इंग्रजी’ यापेक्षा वेगळी असणे बंधनकारक आहे
केंद्रीय विद्यालयांमध्ये अशा विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते, ज्यांच्या पालकांची वेगवेगळ्या शहरांमध्ये सतत बदली (Transfer) होत असते. अशा विद्यार्थ्यांना देशात कुठेही गेल्यावर एकसारखीच भाषा व्यवस्था मिळाल्यामुळे त्यांचे शिक्षण अखंडपणे सुरू ठेवण्यास मोठी मदत होणार आहे.
या शाळांना असे निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून तिसऱ्या भाषेसाठी त्यांच्या पसंतीची (Choice) माहिती घ्यावी. याच माहितीच्या आधारे शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे सेक्शन्स तयार केले जातील आणि पुढील शैक्षणिक नियोजन केले जाईल.
ही नवीन भाषा व्यवस्था लागू करण्यासाठी सर्व केंद्रीय विद्यालयांना निश्चित केलेल्या वेळेत संबंधित माहिती पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. या डेटाच्या आधारे शाळेतील कर्मचारी आणि शिक्षकांच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
काही शाळांमध्ये प्रादेशिक भाषा शिकवणारे शिक्षक आणि संसाधनांची कमतरता भासू शकते. ही बाब लक्षात घेऊन, आवश्यकतेनुसार कंत्राटी शिक्षकांची मदत घेण्याची आणि टप्प्याटप्प्याने ही व्यवस्था लागू करण्याची योजना आखण्यात आली आहे.
शाळांना विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सेक्शन्स तयार करण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी-जास्त असल्यास काही ठिकाणी संयुक्त सेक्शन्स (Combined Sections) तर काही ठिकाणी स्वतंत्र सेक्शन्स बनवले जाऊ शकतात. मात्र, कोणत्याही परिस्थितीत इयत्ता ६ वी आणि ९ वी मध्ये संस्कृत भाषेसाठी किमान एक स्वतंत्र सेक्शन ठेवणे अनिवार्य असेल.






