(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाने आता प्रत्यक्ष शूटिंगच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. गीत ध्वनीमुद्रणानंतर चित्रपटाचा मुहूर्त पार पडताच चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली असून, सध्या मुंबईतील विविध लोकेशन्सवर शूटिंग वेगाने सुरू आहे.
माध्यमांमध्ये या चित्रपटाबाबत येत असलेल्या अपडेट्समुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे. ‘लाईव्ह’च्या कथानकाविषयी आणि सादरीकरणाविषयी चर्चा सुरू असून, चित्रपटाची टीमही जोमाने काम करत आहे.
रिद्धी बिद्दी व्हिजन्स या बॅनरखाली निर्माते सुमित पांडे ‘लाईव्ह’ चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते छबी असीम हल्दर असून, लेखक-दिग्दर्शक संजीव राय आहेत. या चित्रपटाची प्रेरणादायी कथा एका महत्त्वकांक्षी तरुणीभोवती फिरणारी आहे. या कथेच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार असून, समाजातील विविध घटनांचा वेध घेण्यात येणार आहे. नायिकेच्या संघर्ष आणि न्याय-हक्काच्या लढाईची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईतील मढ, गोरेगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे. ‘लाईव्ह’ या शीर्षकावरून चित्रपटात काय पाहायला मिळणार याची कल्पना येत नाही. त्यामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.
ऐश्वर्या शेटे आता रंगभूमी गाजवणार, ‘आता थांबवायचं कसं?’ नाटकातून करणार दमदार पदार्पण!
या चित्रपटाविषयी दिग्दर्शक संजीव राय म्हणाले की, ‘लाईव्ह’ चित्रपटाची कथा समाजातील वास्तव चित्र दाखवणारी आहे. आजच्या युगात सर्वच क्षेत्रांमध्ये तरुणींनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तरीही त्यांच्या समोरील आव्हाने कमी झालेली नाहीत. या चित्रपटाची कथाही अशाच आव्हानात्मक प्रवासावर आधारलेली असून, सरकारी व्यवस्थेचा पर्दाफाश करणारी आहे. समाजातील विविध घटकांचा समावेश असलेला हा चित्रपट आजवर कधीही प्रकाशात न आलेले पैलूंवर प्रकाश टाकणार आहे. वास्तवाला मनोरंजनाची जोड देत ‘लाईव्ह’ चित्रपटाच्या माध्यमातून एक संगीतप्रधान कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी ‘लाईव्ह’ चित्रपटाची संपूर्ण टिम खूप मेहनत घेत असल्याचेही राय यांनी सांगितले.
चित्रपटात कोणते कलाकार झळकणार?
दिग्दर्शक संजीव राय आणि पूनम विभूते यांनी चित्रपटातील अर्थपूर्ण संवाद लिहिले आहेत. या चित्रपटात मिलिंद गुणाजी, अनंत जोग, निशिगंधा वाड, रूपाली जाधव, हितेन तेजवानी, सागर काळे, अनिल नागरथ, नम्रता जाधव, विनय राजपूत आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. गीतकार महालिंग कंठाळे यांनी गीतलेखन केले असून, संगीतकार दिनेश अर्जुना आणि अमन श्लोक या चित्रपटातील गीतांना संगीत देणार आहेत. डिओपी गोपी सिनेमॅटोग्राफी करीत असून, सैफुद्दीन शेख कला दिग्दर्शकाची बाजू सांभाळत आहेत.






