Rahul Gandhi News: 'तुम्ही देश विकायला निघालात, लाज वाटत नाही का?' ट्रेड डिलवरून राहुल गांधींची केंद्र सरकारचे टीका
Rahul Gandhi Criticized on Trade deal News: आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा १० वा दिवस आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अमेरिकेशी झालेल्या व्यापार करारावरून राजकारण तापू लागले आहे. यावरून संपूर्ण देशात उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत आहेत. आजही त्यांनी संसदेत ट्रेड डीलवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचवेळी त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडेही लक्ष वेधलं आहे.
“अर्थसंकल्पात आजच्या आव्हानांना संबोधित केले गेले नाही. अर्थसंकल्पात एआय आणि डेटाबद्दल काहीही नाही. आजच्या काळात एआय खूप महत्वाचे आहे. आपण युद्धाच्या काळात जगत आहोत. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे. चीन अमेरिकेला आव्हान देत आहे. या सध्याच्या युगात ऊर्जा आणि वित्त ही शस्त्रे बनली आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर देखील सुरू आहे. आपल्या अर्थसंकल्पाचा जगभरातील संघर्षांना तोंड देण्याशी काहीही संबंध नाही.”
राहुल गांधी पुढे म्हणाले, “भारतीय डेटा अमेरिकेसाठी खूप महत्वाचा आहे. आपली लोकसंख्या ही एक मोठी ताकद आहे, पण जर हे तुम्ही समजून घेतलं, तरच हे शक्य आहे. जर इंडिया आघाडीचे नेते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वाटाघाटी करत असते, तर भारतीय डेटा ही आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे, असं आम्ही सांगितलें असतं.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरून राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. “अमेरिकेशी व्यापार कराराद्वारे सरकारने गरीब शेतकऱ्यांना चिरडण्याचा मार्ग मोकळा केला आहे. देशाच्या कोणत्याही पंतप्रधानांनी असे यापूर्वी केलेले नाही. आपले शेतकरी पहिल्यांदाच अशा संकटाचा सामना करत आहेत. पण अमेरिकेशी कलेल्या व्यापार करारातून अमेरिकेतील आयात ४६ अब्ज डॉलर्सवरून १४६ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल. भारतावरील आयात शुल्क ३ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे आणि त्यांचे आयात शुल्क १६ टक्क्यांवरून शून्यावर आले आहे.”
“मी म्हणतोय की तुम्ही देश विकला आहे. तुम्हाला भारत विकण्याची लाज वाटत नाही का? तुम्ही आमची भारतमाता, भारतमाता विकली आहे.”
राहुल गांधी म्हणाले, “मी आर्थिक सर्वेक्षण पाहत होतो आणि मला दोन गोष्टी जाणवल्या. पहिली गोष्ट म्हणजे, आपण अशा जगात राहतो जिथे भू-राजकीय संघर्ष वेगाने वाढत आहे. अमेरिकेच्या वर्चस्वाला चीन, रशिया आणि इतर शक्ती आव्हान देत आहेत. शिवाय, आपण ऊर्जा आणि वित्त यांच्या शस्त्रीकरणाच्या जगात राहतो. पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी काही काळापूर्वी एक धक्कादायक विधान केले होते की युद्धाचा काळ संपला आहे. खरं तर, आपण युद्धाच्या युगात प्रवेश करत आहोत. तुम्ही पाहू शकता की युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे, गाझामध्ये युद्ध झाले आहे, मध्य पूर्वेत युद्ध चालू आहे आणि इराणमध्ये युद्धाचा धोका आहे.”
राहुल गांधी म्हणाले, “मी सरकारला एआयच्या परिणामांबद्दल इशारा देऊ इच्छितो. भारतात लोकप्रिय असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याच्या कल्पनेला आव्हान दिले जाणार आहे. जेव्हा तुम्ही धोकादायक जगात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला पहिली गोष्ट समजून घ्यावी लागते ती म्हणजे व्यक्ती आणि राष्ट्र म्हणून तुमची ताकद. १.४ अब्ज लोक, प्रतिभावान, उत्साही, गतिमान, जे जगातील कोणालाही आव्हान देऊ शकतात.”






