कोल्हापूर : छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर भाजपने या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती यांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व आलं आहे. संभाजी छत्रपती यांनी ट्विट करून आपली भूमिका व्यक्त केली आहे. छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पाहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू, असं संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे.
छत्रपती घराण्यातील व्यक्तीचं काम पेटवणं नाही तर न्याय देणं आहे. आणि ताकतच पाहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखवण्यासाठी लोकांचे जीव घेणं योग्य नाही. त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू.
ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 4, 2021
यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन मी पुन्हा करत आहे. स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. तसेचं सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी..! माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे; यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन, असंही संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.