फोटो सौजन्य - Social Media
सावखेड भोई ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि निधी अपहार प्रकरणात दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी दिव्यांग नागरिक प्रल्हाद नारायण हांडे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मंगळवारी रात्री मागे घेतले. प्रशासनाकडून १५ दिवसांच्या आत आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषणाची सांगता केली. प्रल्हाद हांडे यांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी सावखेड भोई ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकांनी अपहाराची रक्कम ग्रामपंचायत निधीत जमा केल्याचाही उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.
शासनाच्या ४ जानेवारी २०१७ च्या परिपत्रकानुसार अपहार सिद्ध झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र चौकशीत अनियमितता स्पष्ट होऊनही अद्याप कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप हांडे यांनी केला होता. याशिवाय तक्रारीच्या चौकशीसाठी वारंवार पंचायत समिती कार्यालयात जावे लागल्याने मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले.
चौकशी अहवालानुसार दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी त्यांनी सोमवारी उपोषण सुरू केले होते. शासन नियमानुसार तक्रारीची चौकशी एका महिन्याच्या आत पूर्ण होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागल्याचा आरोपही त्यांनी केला.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकारी मुकेश माहोर, जिल्हा परिषद सहाय्यक गटविकास अधिकारी एस. डी. तायडे, शिवसेना नेते दीपक बोरकर, ग्रामसेवक एन. एस. राठोड आणि विठ्ठल माने यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. यावेळी चौकशी समितीच्या आदेशानुसार पुढील १५ दिवसांत आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर प्रल्हाद हांडे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
यावेळी गणेश हांडे, प्रवीण हांडे, बंडूराजे डोळस, नारायण जाधव, कांता हांडे, ज्ञानेश्वर टेकाळे, ज्ञानेश्वर माने, रविंद्र मगर, अमोल टेकाळे, वैभव ढोबळे, प्रवीण माने, यश पाटील, संतोष टेकाळे आदी उपस्थित होते. या प्रकरणातील पुढील कारवाईकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.






