सौजन्य - नवराष्ट्र टीम
सावंतवाडी : पावसाळा उंबरठ्यावर असतानाही सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या महावितरणच्या संथ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसातून १० ते १२ वेळा वीज खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या सत्ताधारी नगरसेवकांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी लोकप्रतिनिधींनी उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना चांगलेच धारेवर धरत जाब विचारला.
यापूर्वी वीज वाहिनी पडून दोघांचा मृत्यू झाला असतानाही प्रशासन ढिम्म का? असा सवाल आनंद नेवगी यांनी उपस्थित केला. उपअभियंता शैलेश राक्षे यांनी कर्मचाऱ्यांची टंचाई आणि खासगी कामगार मिळत नसल्याची अडचण मांडली. मात्र, बबन साळगावकर यांनी थेट वरिष्ठ कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधण्यास भाग पाडले. अखेर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन महावितरणने दिले. येत्या काही दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला आहे.
पावसाच्या तोंडावरच कामे आठवतात का?
शहरातील वीज प्रश्नावरून आक्रमक झालेल्या लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. ‘ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दुरुस्तीची कामे काढून जनतेला वेठीस का धरता? इतके दिवस प्रशासन काय करत होते? असा तिखट सवाल यावेळी करण्यात आला. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, आनंद नेवगी, नीलम नाईक, सुकन्या टोपले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाघोबा खिंडीत एसटी बसचा अपघात; सहा प्रवासी जखमी
महावितरणचे अजब समर्थन आणि अपघात
शहरात दोन फिडर असून, एका कामासाठी संपूर्ण शहराचा पुरवठा बंद ठेवावा लागतो, असे अजब समर्थन अधिकाऱ्यांनी दिले. त्यावर नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जीर्ण खांबांचा धोका: शहरात अनेक ठिकाणी खांब जीर्ण झाले आहेत. मिलाग्रीस हायस्कूलसमोर एक खांब गटारात पडल्याने विद्यार्थिनीला दुखापत झाल्याची घटना नगरसेविका सुकन्या टोपले यांनी समोर आणली.
आम्ही सत्तेत असलो तरी नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरू. पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत राहिला नाही, तर गाठ आमच्याशी आहे. — बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष.






