महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न; ७०% भाजलेल्या महिलेची प्रकृती गंभीर, परिवहनमंत्री शहरात असतानाच घटना
मिळालेल्या माहितीनुसार, बीबी पाटील या भूविकास बँकेत कार्यरत होत्या. मात्र बँकेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर त्यांच्या सेवेला फटका बसला. प्रलंबित वेतन, सेवा लाभ आणि बँकिंग क्षेत्रात समावेश करून घेण्याची मागणी त्या सातत्याने प्रशासनाकडे करत होत्या. पूर्ण वेतन मिळावे किंवा पर्यायी व्यवस्था करावी, यासाठी त्यांनी अनेकदा निवेदने दिली होती. विशेष म्हणजे २० एप्रिल 2026 रोजीच त्यांनी आत्मदहनाचा इशारा देणारे निवेदन प्रशासनाला दिले होते. मात्र या इशाऱ्याकडे पोलीस व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
महाराष्ट्र दिनाच्या प्रमुख कार्यक्रमादरम्यान संतप्त अवस्थेत त्यांनी अचानक आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी त्या गंभीररीत्या भाजल्या.
या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शहरात उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. सुरक्षा व्यवस्था, निवेदनांवरील कार्यवाही आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. महाराष्ट्र दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
ठाण्यातही डबल डेकर बसची एंट्री! टीएमटी ताफ्यात ३०० नव्या बसेसची भर, प्रवाशांना मोठा दिलासा






