Farmer Loan : शेतकरी कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव नाही का? मग ही बातमी आधी वाचाच
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची माहिती दिली. पहिल्या यादीत नाव न आलेले किंवा अर्ज प्रक्रियेत असलेले शेतकरी दुसऱ्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. राज्यातील बँकांनी महा-आयटी प्रणालीवर सुमारे 31.17 लाख कर्जखात्यांची माहिती अपलोड केली असून, त्यातून पुढील टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र ठरले आहेत. यासाठी राज्य शासनाने सुमारे ₹13,600 कोटींची तरतूद केली आहे. पुणे जिल्ह्यातील 64,664 शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तर राज्यात सर्वाधिक 1,32,734 लाभार्थी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत.
सहकार विभागाच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात ₹2 लाखांपर्यंत थकीत पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांचाच समावेश करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांची थकबाकी ₹2 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा इतर श्रेणीतील प्रकरणे आहेत, त्यांचा विचार पुढील टप्प्यातील याद्यांमध्ये केला जाणार आहे.
पहिल्या यादीतील सुमारे 4 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण पुढील चार दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, प्रक्रिया पूर्ण होताच कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आलेली नाहीत, त्यांनी घाबरून न जाता संबंधित जिल्हास्तरीय समिती किंवा तहसीलदार कार्यालयाकडे आवश्यक अर्ज सादर करावा, असे आवाहन सहकार प्रशासनाने केले आहे.
व्यापारी बँकांमधील एनपीए (NPA) कर्जखात्यांसाठी कालावधीनुसार 35 ते 85 टक्क्यांपर्यंत तडजोडीची सवलत देण्यात आली आहे. गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील तडजोडीच्या रकमेपैकी पात्र शेतकऱ्यांच्या ₹2 लाखांपर्यंतच्या थकबाकीची भरपाई राज्य सरकार करणार आहे.
याशिवाय, 1 एप्रिलनंतर या कर्जखात्यांवर अतिरिक्त व्याज आकारू नये, असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने व्यापारी बँकांना दिले आहेत.






