कर्जत–नेरळ–माथेरान मार्गावर मोठा अपघात टळला; मिनीबसचा गियर बॉक्स निकामी, ४५ प्रवाशांचे प्राण वाचले
कर्जत एसटी आगारातून कर्जत नेरळ माथेरान अशी मिनीबस सकाळी नेहमीप्रमाणे माथेरान येथे जाण्यास निघाली. सकाळी सव्वा आठ वाजता निघालेली मिनीबस कर्जत येथून निघाली आणि नेरळ येथे वेळेवर पोहचली. सकाळची वेळ असल्याने या 30 सीट वाहून नेण्याची क्षमता असलेल्या मिनीबस मध्ये तब्बल 45 प्रवासी प्रवास करीत होते. नेरळ येथून माथेरान घाट रस्त्याने ही मिनीबस प्रवाशांना घेऊन पुढे जात असताना जुन्मापट्टी येथील चढाव पार केल्यावर गाडीचे गियर पडले जात नसल्याचे चालक नितीन जाधव यांच्या लक्षात आले.
त्या ठिकाणी चढाव पूर्ण केल्यावर काही अंतर पुढे नेवून चालक जाधव यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यावेळी अचानक गाडी थांबल्याने प्रवासी देखील घाबरले.प्रवाशांनी तत्काळ उतरावे अशी सूचना चालक करीत असल्याने सर्व प्रवासी खाली उतरले,त्यावेळी गाडी मध्ये काय बिघाड झाला आहे याची माहिती प्रवाशांना कळली.त्यामुळे दैव बलवत्तर असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली.
जुम्मापट्टी येथील वळणाचा तीव्र चढाव पार करून पुढे मिनीबस थांबल्याने मोठा अनर्थ टळला आहे.त्यात माथेरान येथून नेरळ कडे परत येताना मिनिबसचे गियर बॉक्स मध्ये बिघाड झाली असती तर मोठा अपघात नेरळ माथेरान घाटात राज्य परिवहन महामंडळाच्या मिनीबस गाडीला होऊ शकला असता.त्याचवेळी घाटात अनेक ठिकाणी तीव्र चढाव आहेत आणि त्या ठिकाणी गाडी बंद पडली असती तर देखील मोठा अनर्थ घडला असतात.मात्र चालकाच्या प्रसंगावधान यामुळे मिनीबस मधून प्रवास करणाऱ्या 45 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
चालकाला गाडीमध्ये बिघाड झाल्याचे कळल्यावर त्यांनी तत्काळ गाडी धोक्याच्या बाहेर आल्यावर थांबवली,त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.शासनाने दोन मिनीबस घेण्याचे जाहीर केले आहे,त्यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या मिनीबस माथेरान घाटात चाचणी साठी आणल्या गेल्या आहेत.यापूर्वी दोन वेळा मिनी बस चे चाचणी झाली आहे,पण नवीन गाड्यांची खरेदी शासनाने केलेली नाही.शासनाने नवीन गाड्या खरेदी करून माथेरान येथे येणारे प्रवासी आणि स्थानिकांची गैरसोय टाळावी, अशी प्रतिक्रिया प्रवासी नितीन सावंत यांनी दिली.






