Rohit Pawar Criticisim: ४ महिन्यांनंतरही ठोस माहिती नाही; रोहित पवारांची 'सीआयडी'च्या संथ कारभारावर जोरदार टीका
दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघात झाला. अपघात प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींवर कठोर कारवाईची मागणी रोहित पवार हे सातत्याने करत आहेत. विमान अपघात प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडून सुरू आहे. सीआयडीकडून तपास संथगतीने होत आहे. अद्याप ठोस कारवाई तसेच तपासातील प्रगती अहवाल सादर करण्यात आला नाही, अशी टीका रोहित पवार यांनी शुक्रवारी (२९ मे) केली. ‘सीआयडी’ कार्यालयाला पवार यांनी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. पवार हे कुलूप घेऊन ‘सीआयडी’ कार्यालयात आले होते.
विमान अपघात प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. सीआयडीकडून विविध विभाग, तसेच संस्थाशी संपर्क साधण्यात आला आहे. विविध यंत्रणाकडून तपासाच्या अनुषंगाने लागणारी माहिती, तसेच अहवाल मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे’, अशी माहिती सीआयडीतील अधिका-यांनी दिली.
पण अजित पवार यांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणाच्या तपासात चार महिने उलटूनही कोणतीही ठोस प्रगती झालेली दिसत नाही. तपासातील या विलंबामुळे प्रकरणातील संभाव्य कट किंवा गैरप्रकार दडपले जात आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, सीआयडी कार्यालयाला भेट दिल्यानंतर वरिष्ठ अधिकारी भेटले नाहीत आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली.
रोहित पवार म्हणाले की, पूर्वी काही गाजलेल्या प्रकरणांमध्ये सीआयडीने तुलनेने जलद गतीने आरोपपत्र दाखल केले होते, मात्र या प्रकरणात तपास संथ असल्याचे दिसत आहे. पण एएआयबी (Aircraft Accident Investigation Bureau) अहवालाची वाट पाहणे हा केवळ बहाणा असल्याचाही आरोप केला.
“पूर्वी सीआयडीकडून केल्या जणाऱ्या तपासाबद्दल शंका उपस्थित केली जात नव्हती. आता परिस्थिती बदलली आहे. सीआयडीकडून जबाबदारीने काम केले जात नाही. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात तपास काय झाला? याची माहिती घेण्यासाठी गेले चार महिने प्रयत्न केले जात आहे. अजित पवार विमान अपघात प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.






