'आज सहा खासदार गेले, उद्या १२ जातील’; उबाठाला आणखी धक्क्याचा किरण पावसकरांचा दावा
पावसकर म्हणाले की, आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे विदर्भात गेले आहेत, मात्र नगर पालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत उबाठा नेतृत्व बांद्रा बाहेर पडले नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना वाऱ्यावर सोडले होते. उबाठाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊनच खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या मतदार संघात जाऊन आज मतदारांनी माफी मागण्याचा उबाठाचा प्रयत्न आहेत. मात्र त्यांनी यापूर्वीच दौरा का केला नाही, असा प्रश्न तेथील कार्यकर्ते, पदाधिकारी, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख उबाठाला विचारतील. मतदारांची माफी नाही तर मुलाची राजकीय कारकिर्द वाचवण्यासाठी उबाठा दौरा करत आहेत, अशी टीका पावसकर यांनी केली.
पावसकर पुढे म्हणाले की, वरळीसारख्या सुरक्षित मतदार संघातून मुलाला निवडून आणण्यासाठी उबाठाला दोन आमदारांचा पत्ता कापावा लागला. आमदार सुनील शिंदे आणि आमदार सचिन अहिर यांना विधान परिषदेवर उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे लागले. त्यामुळे आताही मुलाच्या करियरसाठी उबाठा विदर्भाच्या दौऱ्यावर गेले आहेत, असे पावसकर म्हणाले. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ६५ नगरसेवक शिवसेनेत आले. उबाठातून ४० आमदार शिवसेनेत गेले त्याचे ६० आमदार झाले. आज सहा खासदार गेले उद्या त्याचे १२ होतील, असे पावसकर म्हणाले.
आमदार फोडले, खासदार फोडले, नगर सेवक फोडले या आरोपांना काही महत्व उरलेले नाही. हे सर्व लोकप्रतिनिधी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी शिवसेनेत का प्रवेश करतात, याचे आत्मपरिक्षण उबाठाने करायला हवे. आजही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी हे शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत, याच कारण शिंदे यांचे नेतृत्व तळागाळातून जाऊन काम करतेय, घरात बसून काम करत नाही, असा टोला पावसकर यांनी लगावला. भविष्यातील पक्ष प्रवेशांबाबत लवकरच मोठी बातमी कळेल, असे पावसकर म्हणाले.






